अंबाजोगाईत बारा दिवसांपासून निर्जळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:44+5:302021-07-25T04:27:44+5:30
१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा खाजगी टँकर वाल्यांची चलती भर पावसाळ्यात पाणीटंचाई पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप ...

अंबाजोगाईत बारा दिवसांपासून निर्जळी
१० ते १२ दिवसाआड अंबाजोगाईकरांना पाणीपुरवठा
खाजगी टँकर वाल्यांची चलती
भर पावसाळ्यात पाणीटंचाई
पावसाळ्यात टंचाईच्या झळा : विजेअभावी पंप हाऊस बंदचा फटका
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराला आठवड्यातून किमान एकवेळ पाणीपुरवठा होतो. मात्र, या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसाआड होऊ लागल्याने शहराला पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने शहरवासीयांना आठवड्यातून किमान एकदा पाणीपुरवठा होतो. मात्र, या पाणीपुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नगर परिषदेकडे नाही. जेव्हा पाण्याची टाकी भरेल तेव्हा त्या-त्या प्रभागात पाणी सोडले जाते. या महिन्यात आठवड्यात होणारा पाणीपुरवठा आता १० ते १२ दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. परिणामी शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शहर व परिसरात धो-धो पाऊस पडत असतानाही शहरातील नागरिकांना मात्र हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. अंबाजोगाई शहराला धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. धरण गेल्या वर्षी भरून वाहिले. सध्या धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा गैरफायदा खासगी टँकरवाले घेत आहेत. ३०० लिटर पाण्यासाठी शहरवासीयांना दीडशे रुपये मोजावे लागतात, तरच पाणी विकत मिळते. वाढत्या पाणीटंचाईमुळे खाजगी टँकरवाल्यांची चलती सुरू आहे. परिणामी नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या वतीने जेव्हा पाणीपुरवठा केला जातो त्यासाठी कसलेही वेळापत्रक उपलब्ध नाही. अथवा पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय ठराविक दिवस अथवा वेळ ठरवून दिली जात नसल्याने ज्या दिवशी पाणीपुरवठा होतो त्या दिवशी त्या कुटुंबातील व्यक्तीला आपले दैनंदिन व्यवहार सोडून नळाला पाणी कधी येईल, याची वाट पाहत बसावी लागते.
पाणीपुरवठा सुरळीत करावा
अंबाजोगाई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करून शहरवासीयांना दिवस व वेळ ठरवून पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्यात यावे. पाणीपुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा. ज्या परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे, त्या प्रभागात वीजपुरवठा सुरू असतानाच पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.
धनेगाव धरण परिसरात असणाऱ्या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्याची दुरुस्ती झाली आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने धरणातील पंप हाऊस बंद राहिले. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता. परिणामी दोन दिवस पाणी सोडण्यासाठी उशीर झाला. आता सर्व प्रभागनिहाय पाणी दिले जात आहे.
अशोक साबळे, मुख्याधिकारी, नगर परिषद, अंबाजोगाई