रस्त्यावरील दररोजच्या बाजारामुळे वाहतुकीचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:15+5:302021-07-02T04:23:15+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचे दररोजच्या समस्यांऐवजी गुटखा पकडणे आणि क्लबच्या पत्त्यावर छापा मारून कारवाई ...

रस्त्यावरील दररोजच्या बाजारामुळे वाहतुकीचे तीनतेरा
गेल्या दोन महिन्यांपासून वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचे दररोजच्या समस्यांऐवजी गुटखा पकडणे आणि क्लबच्या पत्त्यावर छापा मारून कारवाई करणे याकडे अधिक लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमध्ये सर्व ठिकाणचे आठवडी बाजार बंद करण्यात आलेले होते. बाजार भरविण्यासाठी संपूर्ण बंदी होती. भाजीपाला विक्रीसाठी ठरवून दिलेल्या दिवशी मुभा होती.
भाजीपाला विक्रेते, हात गाडे, दुकानांच्या पाट्या, उभा राहिलेली वाहने, इत्यादी बाबी वाहतुकीसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शहरातील रस्त्याचे नव्याने करण्यात आलेल्या डांबरीकरणामुळे रस्त्याच्या कडेला मोठा चढ उतार निर्माण झाला आहे. त्यासाठी साइडपट्ट्या भरून घेणे आवश्यक झाले आहे.
रस्त्यावरून वाहने खाली उतरता येत नसल्याने अनेक वाहनधारकांना नाइलाजाने आपली वाहने रस्त्यावरच उभी करावी लागतात. त्यामुळे आणखीनच वाहतुकीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. शहरातील सावरकर चौक, बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत भगवान बाबा चौक, प्रशांतनगर, बस डेपो, अण्णाभाऊ साठे चौक, मांडवा रोड, मोरेवाडी, यशवंतराव चव्हाण चौक इ. ठिकाणी वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. ही समस्या वाहनधारकांसाठी व नागरिकांसाठी दररोजची झाल्याने त्रासदायक ठरत आहे.
भाजीपाला अथवा छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे रस्त्यालगत बसू नये. खरे तर आता आठवडी बाजार सुरू करण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी आपला व्यवसाय करावा. याबाबतीत वरिष्ठांशी बोलून पुढील कारवाई करण्यात येईल.
-रमेश सोनकांबळे,
स्वच्छता निरीक्षक
010721\avinash mudegaonkar_img-20210117-wa0012_14.jpg