सिंदफना, उथळा प्रकल्पातील पाण्याने गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:45+5:302021-08-01T04:30:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र अजूनपर्यंत सिंदफना व उथळा मध्यम ...

सिंदफना, उथळा प्रकल्पातील पाण्याने गाठला तळ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. मात्र अजूनपर्यंत सिंदफना व उथळा मध्यम प्रकल्पात पाण्याचा नव्याने थेंबही जमा झाला नाही. तालुक्यातील नद्या-नालेही कोरडेठाक आहेत. मोठा पाऊस नसल्याने पाणी प्रश्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिरूर तालुक्यातील सिंदफना प्रकल्प सर्वांत जुना आहे. त्यानंतर उथळा मध्यम प्रकल्प तयार झाला. या दोन्ही प्रकल्पांशिवाय बेलपारा मध्यम प्रकल्पदेखील तालुक्याला आधारभूत ठरत असतो. गतवर्षी सर्व प्रकल्प ओसंडून वाहत होते. परिणामी, नद्या-नाल्यांनादेखील पाणी दिसत होते. या वर्षीही पाऊस वेळेवर आला खरा, परंतु कुठेच पाणी वाहिले नाही. सध्या शेतशिवार पिकाने हिरवेगार दिसत आहेत. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने आता पिकालाही पावसाची गरज भासू लागल्याची स्थिती आहे.
तालुक्यात सिंदफना, उथळा, बेलपारा, घाटशिळा, मोरजळवाडी, उकांडा, वार्णी आदी ठिकाणी लहान-मोठे दहा-बारा जलाशय आहेत. परंतु एकाही जलाशयात पाणी जमा झाले नाही. पाऊस आहे, पण पाणी नाही.. अशी अवस्था असल्याने भविष्यातील पाणीटंचाईबाबत चिंता व्यक्त होत आहे. पावसाच्या नोंदीवरून एकूण टक्केवारीत जवळपास अर्धाच पल्ला गाठला आहे.
....
९ टक्केच पाणीसाठा
सध्या सिंदफना मध्यम प्रकल्पात ९ टक्के पाणीसाठा आहे. नव्याने पाणीपातळीत वाढ झालीच नाही. तीच अवस्था उथळा प्रकल्पाची आहे. याच प्रकल्पावरून शहराला पाणीपुरवठा होत असल्याने हे दोन्ही प्रकल्प भरणे शिरूरकरांसाठी गरजेचे आहे. शहराच्या जवळच असलेला सिद्धेश्वर बंधारादेखील अद्याप कोरडाच आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. अन्यथा पुन्हा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल, असे चित्र सध्या आहे.
310721\img-20210527-wa0051.jpg
फोटो