आधुनिक तंत्राने सर्जा-राजा नामशेष होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:31+5:302021-09-04T04:40:31+5:30
पोळा विशेष लोकमत न्यूज नेटवर्क कडा : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असे. गावागावातील शेतकरी त्यांच्या ...

आधुनिक तंत्राने सर्जा-राजा नामशेष होण्याची चिन्हे
पोळा विशेष
लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असे. गावागावातील शेतकरी त्यांच्या दारात बैलांची जोडी असायची; पण काही वर्षांपासून बैल सांभाळण्यापेक्षा दुभत्या गायी पालनाचा कल वाढत गेला. शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने शेतकऱ्यांच्या दावणीपुढील बैलांची संख्या घटली. बैलांऐवजी घरासमोर ट्रॅक्टर दिसू लागले. यामुळे लाखांच्या घरात असलेल्या बैलांची संख्या आता फक्त १७ हजार ५८९ एवढी आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्जा-राजाची बैलजोड आता दावणीतून नामशेष होऊ लागल्याचे पशुधन विकास कार्यालयाच्या आकडेवारीवरून दिसत आहेत.
पूर्वी पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बैलांची थाटामाटात पूजन करून मिरवणूक काढायचा. तेव्हा गावच्या मंदिरासमोर जागा अपुरी पडायची. बैलांशिवाय शेती नसायची; पण आता आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने आणि बैलजोड्या संभाळताना पोषण्याचा खर्च विनाकारण वाटू लागल्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागली. तर बैलजोडीऐवजी दुभत्या गायी घेऊन त्या सांभाळण्याकडे कल वाढला. त्या पैशातून शेतीची ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागल्याने बैलजोडी भविष्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पोळ्याला बोटावर मोजता येतील एवढ्याच बैलजोड्या आहेत.
....
कृषी विभागाकडून ट्रॅक्टर
आधुनिक काळात शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला महत्त्व येऊ लागले. मोठ्या प्रमाणावर शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू लागले. त्याचबरोबर कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर मिळू लागल्याने बैलाजोडीसाठी शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका पशुधन विकास कार्यालयात २०१९च्या पशुगणनेनुसार शेतीकामाठी फक्त १७ हजार ५८९ बैलाची नोंद आहे. गावरान, विदेशी, रेडकू अशा लहान मोठ्याची एकूण २५ हजार ५५९ ची नोंद असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
...
बैलांना मोठ्या प्रमाणावर चारा लागतो. शेतीचा फायदा होतो. थोडी शेती असल्याने बैलजोड संभाळणे शक्य नसल्याने ट्रॅक्टरची शेती परवडत आहे. -गहिनीनाथ आंधळे,शेतकरी,लिंबोडी, ता. आष्टी.
...
दहा वर्षांपूर्वी आमच्या गावात घरोघरी बैलजोडी असायची. त्यानेच शेती व्हायची. पोळ्याला बैलजोडी दारात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटायचा. आता आमच्या गावात दहा ते पंधरा बैल आहेत.
-सोपान आंधळे, लिंबोडी, ता. आष्टी.