भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:19+5:302021-07-24T04:20:19+5:30
बीड : उन्हाळ्यात स्वस्त मिळणारा भाजीपाला आता पावसाळी वातावरणामुळे महाग झाला आहे. यातच डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचलेले ...

भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!
बीड : उन्हाळ्यात स्वस्त मिळणारा भाजीपाला आता पावसाळी वातावरणामुळे महाग झाला आहे. यातच डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. महागाई आवाक्याबहेर जात असल्याने सामान्य कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. पावसाळ्यात नेहमी भाज्यांचे दर वाढतेच राहिले आहेत. उघडीप मिळेपर्यंत आणि बाजारात चांगली आवक होईपर्यंत चढे भाव राहणार आहेत. यातच आगामी श्रावणातील सण, उत्सवामुळे आणि डाळींच्या साठवणुकीबाबतच्या नियमांमुळे येत्या काही दिवसात डाळींचे दर भडकणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे इतर डाळींच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या मसूर डाळीचा वापर वाढत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.
डाळींचे दर (प्रती किलो)
हरभरा - ७०
तूर - १००
मूग - १००
उडीद -१००
मसूर - ७५
२) भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)
बटाटा -२०
कांदा - २०
टोमॅटो - ३०
काकडी - २०
दोडके - ६०
गवार - ६०
शेवगा -१००
लिंबू - २०
कोथिंबीर जुडी -२०० रुपये शेकडा
पालक जुडी - २०० रुपये शेकडा
मेथी जुडी- ४०० रुपये शेकडा
म्हणून डाळ महागली
मेपर्यंत डाळींचे भाव १० ते २० रुपये किलोपर्यंत वाढले होते. ते जूनमध्ये उतरले आहेत. मात्र तरीही डाळींचे भाव १०० रुपये किलाेपर्यंत आहेत.
आयात धोरण, साठवणुकीबाबत मर्यादा, वाहतूक दरवाढीमुळे काही अंशी भाववाढ झाली. पर्याय व बदल म्हणून मसूर डाळीचा वापर वाढला असला तरी तूर, मूग, हरभरा डाळींनाच चांगली मागणी आहे. स्टॉक मर्यादेचा डाळींच्या दरावर परिणाम होणार नाही, आगामी सणासुदीतही हेच भाव राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी गंगाबिशन करवा म्हणाले.
म्हणून भाजीपाला कडाडला
लॉकडाऊन काळातही पुरेशा प्रमाणात भाज्यांची आवक होती. त्यामुळे दर स्वस्त होते. उघडीप नसल्याने व रिपरिप पावसामुळे भाज्यांची तोडणी करण्यास अडथळे येत आहेत. ठोक बाजारात सध्या आवक कमी आहे. तसेच बाहेरगावाहून वाहतुकीद्वारे फळभाज्या आणाव्या लागतात. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे भाजी विक्रेता हुजेब बागवान यांनी सांगितले.
सर्वसामान्यांचे हाल
गॅसच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. यातच भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत आहेत. व्यापार, व्यवहारांवर आधीच कोरोनाचा परिणाम झाल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. -- शुभांगी भरडे, गृहिणी, बीड.
-----------
मागील वर्षापासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांच्या गरजेच्या व जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवायला हवेत. रोजच्या आहारात तूर, हरभरा व मूग डाळीचाच वापर केला जातो. त्यामुळे मसूर डाळ स्वस्त असली तरी कमी प्रमाणातच वापरतो. - अर्चना राठौर, गृहिणी, बीड.
----------