वडवणी : केंद्र सरकारने गोरगरिबांना उज्ज्वला गॅसचे वाटप केले. दिवसेंदिवस गॅसचा भडका उडत आहे. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ग्रामीण भागात तर उज्ज्वला गेला चुलीत, असे म्हणत चक्क चुली पेटायला सुरुवात झाली आहे.
महागाईविरोधात केंद्र सरकारकडून कुठल्याच प्रकारे योग्य ती खबरदारी न घेतल्याने ग्रामीण भागातील व शहरातील गृहिणीचे बजेट कोलमडले असल्याने पारंपरिक चुलीवर स्वयंपाक होताना दिसत आहे. इंधनाचे दर दिवसागणिक वाढतच आहेत. गॅसचे दर महिन्याला ठरतात. यात सातत्याने वाढच होत आहे. १ जुलैरोजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गोरगरिबांना गॅसचे वितरण करतेवेळी मोठा गाजावाजा केला होता. वाढीव दर आता या गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात तर आता चक्क चुली पेटत आहेत. चुली पेंटवण्यासाठी सरपण लागते. सरपणासाठी वृक्षतोड आलीच. त्यामुळे आता वनचोरीचे प्रकार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. महिलांना चुली फुंकाव्या लागू नयेत, चुली फुंकल्याने धुरामुळे महिलांमध्ये फुफ्फुसाचे आजार वाढतात. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने गॅस योजना आणली होती. ही योजना राबविल्यानंतर ग्रामीण भागात कल बदलला होता, परंतु गॅसचा वारंवार भडका उडत असल्याने गॅस अडगळीला पडत असून, चुली पुन्हा पेटत आहेत.