गावात पिण्याचे पाणी कायम मिळण्यासाठी आराखडा तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:29+5:302021-07-27T04:35:29+5:30
ऋषिकेश यशोद : जलजीवन मिशनअंतर्गत बुधवारपासून तालुका पातळीवर प्रशिक्षण प्रतिनिधी : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी नळ ...

गावात पिण्याचे पाणी कायम मिळण्यासाठी आराखडा तयार करावा
ऋषिकेश यशोद : जलजीवन मिशनअंतर्गत बुधवारपासून तालुका पातळीवर प्रशिक्षण
प्रतिनिधी : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पिण्याचे पाणी नळ जोडणीद्वारे पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ७ ऑगस्टपर्यंत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी कायमस्वरुपी नळाने मिळण्यासाठी गाव आराखडा तयार करावा. या विशेष अभियानात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन पंधरवडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन जलजीवन मिशनचे राज्य अभियान संचालक डॉ. ऋषिकेश यशोद यांनी पत्राद्वारे केले आहे. पिण्याचे पाणी सर्वांना नळाने मिळण्यासाठी जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना गाव कृती आराखड्याबाबत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये गाव कृती आराखडा मधील माहितीचे संकलन ,राबविण्याच्या प्रक्रिया ,कोबो टूलद्वारे माहिती अपलोड बाबत हे प्रशिक्षण आहे.
गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी , ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रगुप्त सोनवणे यांनी केले आहे.
--------
आराखड्याची जबाबदारी गावांवरच
तालुका पातळीवर गटविकास अधिकारी २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करतील. यामध्ये गाव कृती आराखड्याबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा स्वयंसेविका, ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधींना प्रशिक्षण देतील. गाव कृती आराखडा निर्मितीची जबाबदारी ही गावांवरच देण्यात आली आहे.
-----
ग्रामसभेत मंजुरीसाठी विषय ठेवा
गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनांचा वापर करून संकलित करण्यात येईल तर ५ ते ७ ऑगस्टदरम्यान प्राप्त माहितीवरून गाव कृती आराखड्याची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मंजुरीकरिता विषय कार्यक्रम पत्रिकेवर ठेवावा, असे डॉ. यशोद यांनी सूचित केले आहे.
-------------