उच्च शिक्षणामधून गुणवत्तापूर्ण नेतृत्व तयार होणे ही काळाची गरज - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:14+5:302021-07-24T04:20:14+5:30
बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध ...

उच्च शिक्षणामधून गुणवत्तापूर्ण नेतृत्व तयार होणे ही काळाची गरज - A
बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध कौशल्ये प्राप्त होत असतात. युवकांनीही उच्च शिक्षण घेत असताना गंभीरपणे अभ्यास करून आपल्यामध्ये गुणवत्तापूर्ण नेतृत्व विकसित करावे, असे प्रतिपादन जी. एस. काॅमर्स काॅलेज, वर्धा येथील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डाॅ. योगेश पतिंगे यांनी केले.
बलभीम महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने २२ जुलै रोजी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप होते तर उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. पतिंगे म्हणाले, वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करत असताना व्यावसायिक कौशल्येही आत्मसात करावी; जेणेकरून उच्च शिक्षण झाल्यावर या कौशल्यांचा उपयोग त्यांना आपला उद्योग-व्यवसाय वाढीसाठी होईल. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपल्याकडे नेतृत्वक्षमता असणे गरजेचे आहे.
उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते म्हणाले, विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी बनावे. तसेच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व प्रभावी बनून तो स्वयंपूर्ण बनायला हवा तरच शिक्षणाचे ध्येय साध्य होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. ईश्वर छानवाल यांनी केले. सूत्रसंचालन आएशा काझी हिने केले तर आभार रोहिणी बियाले या विद्यार्थिनीने मानले. या वेळी वाणिज्य विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.