ठेकेदारांची मुजोरी ! मध्यप्रदेशातील ऊसतोड मजुरांना पैसे न देता घेतले ३ महिने राबवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:57 IST2021-03-13T17:54:47+5:302021-03-13T17:57:54+5:30
मध्यप्रदेश महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांची दलाली करणारी टोळी यात सक्रिय असून मजुरांचे या माध्यमातून आर्थिक शोषण केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

ठेकेदारांची मुजोरी ! मध्यप्रदेशातील ऊसतोड मजुरांना पैसे न देता घेतले ३ महिने राबवून
माजलगाव : मध्यप्रदेशातील 29 ऊसतोड कामगारांचा गेल्या ७ दिवसापासून अन्नाविना उपासमार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील सादोळा येथे एका शेतकऱ्याच्या शेतात मुकादमामार्फत हे मजूर ऊसतोडणीचे काम करत होते. दरम्यान, गेल्या तीन महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणी ठेकेदारांनी या मजुरांकडून आज देतो उद्या देतो असे म्हणत पैसे न देता काम करून घेतले. यात बालकांचाही समावेश आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांची दलाली करणारी टोळी यात सक्रिय असून मजुरांचे या माध्यमातून आर्थिक शोषण केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील बबलू मिया, फिरोज खान, रफीक खान या तिन ऊसतोड ठेकेदारांनी याच जिल्ह्यातील 29 स्त्री-पुरुष ऊसतोड कामगारांना चारशे रुपये प्रतिदिन रोजाने ऊस तोडणी साठी कायम केले. यावेळी 13 डिसेंबर 2020 रोजी यांनी अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील गणेश केंद्रे या ठेकेदारास मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या बॉर्डरवर या टोळ्या हवाली केल्या. यावेळी ऊसतोड कामगारांना तुमचे पैसे एक दोन हप्ते काम केल्यानंतर देण्यात येतील असे सांगण्यात आले. त्यानंतर गणेश केंद्रे या ठेकेदाराने या 29 कामगारांना धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथील बापूसाहेब तिडके, हनुमान तिडके व केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बापू सेफ या मुकादमांच्या स्वाधीन केले. यावेळी या तीन मुकादमांनी 29 कामगारांचे तीन टोळ्यात रूपांतर केले. त्यानंतर त्यांना 17 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे बागेवाडी कारखान्यात नेण्यात आले. याठिकाणी 2 महिने त्यांच्याकडून पैसे न देता काम घेण्यात आले.
पुन्हा उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी कारखान्यात आणून काम घेण्यात आले.त्यानंतर माजलगाव तालुक्यातील सादोळा गावात 14 फेब्रुवारी 2021 रोजी एका शेतकऱ्याच्या शेतात हे ऊस तोडणीचे काम करू लागले. यावेळी त्यांनी सतत तिडके, सेफ यांच्याकडे पैशाची मागणी केली. परंतु सदरील मुकादमांनी आम्ही गणेश केंद्रे सोबत करार केला असल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला.यावेळी मजुरांनी गणेश केंद्रेस फोन लावून पैशाची मागणी केली. केंद्रे यांने सांगितले की, सर्व पैसे मध्यप्रदेशातील तुमच्या ठेकेदारास दिले आहेत. दरम्यान, मजुरांनी मध्यप्रदेशातील त्या तीन ठेकेदाराकडे पैसे मागितले तर त्यांनी, तुमचे सर्व पैसे केंद्रे यांच्याकडे देण्यात आले आहेत असे सांगून टोलवाटोलवी केली. गेल्या तीन महिन्यापासून पैसे न देता त्या 29 मजुरांकडून काम करून घेतल्या जात आहे.त्यामुळे मजुरांनी 7 मार्चपासून काम करणे बंद केले आहे.काम बंद केल्याने मुकादमाने त्यांचे राशन बंद केले. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
समाजसेविका सत्यभामा सौदरमल यांची मदत
सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या निदर्शनास ही बाब येतातच त्यांनी या 29 ऊसतोड कामगार स्त्री-पुरुषांना आपल्या घरी आश्रय दिला. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. तसेच त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देण्याचा त्या प्रयत्नात आहेत. तसेच यास जबाबदार असलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा विचार आहे.