घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकींचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:17+5:302021-05-24T04:32:17+5:30
पुरुषोत्तम करवा / सुशांत आगे माजलगाव : तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकीला ...

घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकींचा होरपळून मृत्यू
पुरुषोत्तम करवा / सुशांत आगे
माजलगाव : तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात विद्युतप्रवाह उतरल्याने मायलेकीला अगोदर विजेचा धक्का लागला व नंतर घरातील एका खोलीला आग लागल्याने दोन्ही मायलेकींचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
किट्टी आडगाव येथील पाटील गल्ली येथे शशिकलाबाई शंकरराव फपाळ (वय ६५) व त्यांची लेक सखुबाई शेषराव फपाळ (४५) या दोघी राहत असत. सकाळी सहा वाजता उठल्यानंतर सखुबाई दूध आणायला गेली होती. ती दूध घेऊन आल्यानंतर या दोघींपैकी एकीला विजेचा धक्का बसला. त्यावेळी दुसरी वाचविण्यासाठी गेली असता दोघींनाही धक्का बसला. याचदरम्यान विजेची ठिणगी पडल्याने दोन खोल्यांपैकी एका खोलीत आग लागल्याचे सांगण्यात येते. या घटनेत दोघी मायलेकी होरपळून जागीच ठार झाल्याचे घटनास्थळी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, पाटील गल्लीमध्ये मागील आठ दिवसांपासून अनेक ठिकाणी विद्युत धक्का लागत असल्याच्या तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या होत्या. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे या गावातील नागरिक सांगत होते. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या मायलेकींना आणखी कोणीच नसल्याने या दोघीच या ठिकाणी राहत असत. शशिकलाबाईला आणखी तीन मुली असल्याचे सांगितले जात आहे.
या दोघींवर जागेवरच शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पी. डी. फुनगे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश इधाते, पो.कॉ. रवी राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या ठिकाणी काही घातपाताची शक्यता आम्हाला जाणवली नाही. दोघींपैकी एकीला विजेचा धक्का लागला असेल व तिला सोडवायला दुसरी गेली असेल, तेवढ्यात विजेची ठिणगी पडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. यापुढे तपासात काय ते उघड होईलच.
--नीलेश इधाते, पोलीस उपनिरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणे.