शहरांसाठीच धावते लालपरी, १०० गावांना जीप, टमटमचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:46+5:302021-06-26T04:23:46+5:30

पुरुषोत्तम करवा माजलगाव : येथील आगारातून सध्या केवळ शहरी भागांतील गाड्या सुरू असून, ग्रामीण भागातील १०० गावच्या बस बंदच ...

Lalpari runs only for cities, jeeps for 100 villages, support of Tamtam | शहरांसाठीच धावते लालपरी, १०० गावांना जीप, टमटमचा आधार

शहरांसाठीच धावते लालपरी, १०० गावांना जीप, टमटमचा आधार

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : येथील आगारातून सध्या केवळ शहरी भागांतील गाड्या सुरू असून, ग्रामीण भागातील १०० गावच्या बस बंदच असल्याने या गावातील नागरिकांना अवैध प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यामुळे या वाहनधारकांकडून मनमानी भाडे लावले जात असून, नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे, तर सध्या या आगारास दररोजचे चार लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे.

पहिल्या लॉकडाऊननंतर जेव्हा बससेवा सुरू झाली, तेव्हा प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण दिसत होते. त्यामुळे अनेक दिवस बस प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरविली होती; परंतु दुसऱ्या लॉकडाऊननंतर प्रवाशांची मानसिकता बदलेली दिसून येत होती. सध्या ग्रामीण भागातील बस बंद असल्याने या आगारातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी बस सुरू केल्या आहेत. या गाड्यांना सध्या चांगला फायदा होताना दिसत आहे.

माजलगाव आगाराकडे एकूण ५८ बस असून, सध्या यातील ४२ गाड्या रस्त्यावर धावत आहेत. यामुळे येथील ९५ चालक व १२० वाहक कामावर कार्यरत आहेत. या आगारातून सध्या ग्रामीण भागातील १०० फेऱ्या बंद झाल्या असल्या तरी या गावातून जिल्ह्याबाहेरील अनेक शहरांना बससेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे सध्या आगारातून १५० फेऱ्या सध्या सुरू आहेत. या माध्यमातून सध्या आगाराला दररोज ४ लाख रुपये उत्पन्न मिळत असून, पूर्वी हेच उत्पन्न ६ लाखांपर्यंत होत होते. या आगाराची शहरापेक्षा ग्रामीण भागावर मदार असल्यामुळे आगाराला चांगलेच नुकसान सहन करावे लागत आहे.

----

माजलगाव आगार एकूण बस - ५८

सध्या सुरू असलेल्या बस - ४२

आगारातच उभ्या बस - १६

२) एकूण कर्मचारी - २७८

चालक - ९५

वाहक - १२०

इतर- ६३

सध्या कामावर चालक - ९५

सध्या कामावर वाहक - १२०

मोठेवाडी, आबेगावला बस कधी सुरू होणार?

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी, मोठेवाडी, देवडी, मंजरथ, हिवरा, मोगरा, आनंदगाव, आबेगाव, बोरगाव यासह अनेक गावांना सध्या बस जात नसल्याने प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागात अद्याप सेवा सुरू केलेली नसून प्रवासी प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाची लाट ओसरली आहे, त्यामुळे बससेवेची मागणी आहे; परंतु वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर बसोवा सुरू होऊ शकते.

प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

सध्या ग्रामीण भागातून इतर ठिकाणी जाण्यासाठी बससेवा सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना जीप, टमटम, छोटा हत्ती आदी खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागतो. बस वेळेवर येत असे; परंतु सध्या बस नसल्याने खाजगी वाहनधारकांची मनमानी सुरू असून, भाडेही डबल घेत आहेत.

खासगी वाहनांतून भाडे चारपट

रापमच्या बस प्रवासात आम्हाला प्रवास भाड्यात निम्मी सवलत आहे. त्यामुळे बसने प्रवास करताना खर्चही कमी येतो; पण सध्या जीप, टमटममधून प्रवास करण्यासाठी चारपट पैसे लागत आहेत. ---रघुनाथ कदम, प्रवासी

----

बससेवा सुरू नसल्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची सध्या मनमानी सुरू आहे. वाटेल तेव्हा ते निघतात, वाटेल तेव्हा ते येत असल्यामुळे वेळेत येता जाता येत नाही, तसेच भाडेदेखील त्यांच्या हिशोबाने द्यावे लागत आहे.

---महादेव धपाटे, प्रवासी

------------

Web Title: Lalpari runs only for cities, jeeps for 100 villages, support of Tamtam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.