उन्हाची तीव्रता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:26+5:302021-06-02T04:25:26+5:30
रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात ...

उन्हाची तीव्रता वाढली
रस्त्यावरच्या फांद्या ठरताहेत धोकादायक
अंबाजोगाई : ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून देण्याची मागणी होत आहे.
पालसिंगण परिसरात हातपंप नादुरुस्त
बीड : तालुक्यातील पालसिंगण परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, ज्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी मागणी परिसरातील गावकऱ्यांमधून केली जात आहे.
दुर्लक्षामुळेे वाढतोय संसर्ग
वडवणी : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देऊनही लोक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी कारवाईची मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर दुर्लक्ष झाल्याने विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस व महसूल प्रशासनाने कडक पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.
काळाबाजार रोखण्यासाठी पथके
बीड : पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकरी ही खरिपाच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. यंदा बियाणांचा काळाबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. तरी व्यापाऱ्यांनी योग्य किमतीत शेतकऱ्यांना बियाणे द्यावे, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा तालुका कृषी विभागाने दिला आहे.
कडा येथील पुलाची दुरुस्ती करा
आष्टी : आष्टी तालुक्यातील कडा येथे नगर-बीड रोडवर असलेल्या पुलाची मोठी दुरवस्था झाली आहे. हा पूल आता कालबाह्य झाला आहे. पुलाचे कठडे तुटले आहेत. या पुलावरुन मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असते. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
विद्युत पंपांची चोरी वाढली
बीड : जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंप चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विद्युत पंपाच्या किमती वाढल्या आहेत. त्यात पंप चोरीला गेला तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
अंबाजोगाई : तालुक्यात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे कडेकोट बंदोबस्त प्रत्येक चौकात तैनात ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये म्हणून पोलिसांच्या व्हॅन गस्त घालू लागल्या आहेत. तर ग्रामीण भागातही ग्रामीण पोलीस ठाणे, बर्दापूर पोलीस ठाणे यांच्या वतीने गावोगावी गस्त सुरू असून ग्रामीण भागातही आवश्यकतेप्रमाणे पोलीस यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.
बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी
वडवणी : तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठी बिनव्याजी ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अवकाळी, नैसर्गिक व कोरोनाच्या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आगामी खरिपातील पेरणीसाठी ३ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, अशीही मागणी आहे.