बीड : विवाहित महिलांचा जसा छळ होतो, त्याच प्रकारे विवाहित पुरुषांचा देखील पत्नीकडून छळ होत असल्याच्या घटना वाढत आहेत. कोरोना काळात जवळपास १४९ पत्नीपीडित पुरुषांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, समाज काय म्हणेल, या भीतीने अनेक पुरुष पत्नीचा निमूटपणे छळ सहन करत असल्याचे पत्नीपीडितांचे मत आहे.
विवाहित पती-पत्नीमध्ये अनेक कारणांवरून भांडणे होत असतात. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होते. त्यानंतर नातेवाइकांचा सहभाग यात होऊन ही प्रकरणे पोलिसांपर्यंत जातात. यातून संसारात कलह निर्माण होऊन संसार तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सर्व प्रकरणांवर ‘भरोसा सेल’मध्ये सुनावणी घेऊन दोघांचीही समजूत घालण्यात येते. त्यातून संसार जोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून बहुतांश संसार पुन्हा नव्याने सुरू होतात. तर, काही प्रकरणांमध्ये तडजोड होत नाही. त्यातून पत्नी-पतीविरोधात पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करते. त्यातून न्यायालयात पोटगीदेखील मागितली जाते.
दरम्यान, कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, यातून पती व पत्नीचा कलह वाढला असून, जवळपास १४९ पुरुषांनी पत्नीकडून छळ होत असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये प्रमुख्यांने आई-वडिलांना चांगली वागणूक दिली जात नाही. सतत भांडण करते तर काही प्रकरणांमध्ये विवाहबाह्य संबंध आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत.
कोरोनाकाळात वाढल्या तक्रारी
कोरोनामुळे सर्व उद्योग व्यवासय बंद होते. या काळात दोघेही घरीच असल्यामुळे अनेक कारणांवरून दोघांमध्ये खटके उडत होते. यातून कौटुंबिक वादाला तोंड फुटले. यामध्ये नातेवाईक आल्याने वाद वाढत गेला यातून पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या काळात तक्रारी वाढल्या आहेत.
आर्थिक टंचाई व मोबाइमुळे कौटुंबिक कलह
लॉकडाऊमध्ये नवऱ्याचा व्यवसाय बंद झाला काहींची नोकरी गेली. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली त्यात खर्च कमी करावे लागले. यामुळेदेखील कौटुंबिक वाद झाले.
दोघेही सतत घरी असल्यामुळे मोबाइलवर पती किंवा पत्नी बोलत असेल तर विनाकारण संशय घेऊन दोघांमध्ये वाद झाल्यामुळेदेखील तक्रारी वाढल्या आहेत.
महिला आणि पुरुष एकसमान असल्याचे सर्वत्र बोलले जाते. मात्र, पत्नीकडून होणाऱ्या छळाला पोलीस प्रशासनाकडून महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे पत्नीपीडितांची परिस्थिती वाईट आहे.
पत्नी पीडित
समाजात पत्नीकडून छळ होत असल्याचे मान्य केले जात नाही. मात्र, अनेक पुरुषांचे पत्नीच्या छळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे कायद्यात याप्रकरणांमध्ये लवकर निर्णय घेण्यासाठी विशेष कायदा करावा
पत्नीपीडित
एकमेकांना समजून घेणे गरजेचे
पती-पत्नी एकसमान आहेत, अनेक कुटुंबात दोघेही कमवते आहेत. त्यामुळे एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. संसार सुखाचा करायचा असल्यास कौटुंबिक कलह नसणे गरजेचे आहे. तसेच सततच्या कौटुंबिक कलहातून आर्थिक स्थितीदेखील बिघडते व कुटुंब उघड्यावर येते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
बायकोकडून छळ होत असल्याच्या तक्रारी
२०१८- ८५
२०१९-७८
२०२०-१०६
२०२१ -१४९