दहावीच्या निकालाचे सूत्र अभ्यासू विद्यार्थ्यांना पटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:17+5:302021-06-02T04:25:17+5:30
बीड : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची सूत्रे नुकतीच जाहीर केली आहेत. हे सूत्र अभ्यास कमी असणाऱ्या ...

दहावीच्या निकालाचे सूत्र अभ्यासू विद्यार्थ्यांना पटेना
बीड : राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची सूत्रे नुकतीच जाहीर केली आहेत. हे सूत्र अभ्यास कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरले आहे तर टाॅपर, अभ्यासू असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश कसा मिळणार याची चिंता लागली आहे.
दहावीच्या परीक्षांबाबत शासनाच्या वतीने बोर्डाने पंधरा दिवसांपूर्वी सर्वेक्षण केल्यानंतर नववीच्या मूलभूत पायानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापनाची सूचना आली होती. या सूचनेचा ५० टक्के स्वीकार केल्याचे दिसत आहे. तर गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी शाळांना पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे. अंतर्गत लेखी मूल्यमापन बहुतांश शाळांचे निश्चितच आहे. तर अनेक ठिकाणी अडचणी आहेत. कारण शाळा सुरू झाल्या त्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या वही, वस्तू, पेन, बाटलीला कोणीही स्पर्श करायचा नाही, असे निर्देश होते त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनासाठी शिक्षकांना कानोसा देखील घेता आलेला नाही. तरीही सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागणार हे स्पष्ट आहे.
शासनाने ठरवलेले ५० ३० २० असे शंभर गुणांचे सूत्र योग्य व चांगले आहे. यामुळे गुणवत्ता स्थिर राहणार आहे. सगळ्यांचे समाधान या सूत्रामध्ये आहे. किमान ९५ टक्के तरी पालक, विद्यार्थ्यांचे समाधान आहे. - दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक, द्वारकादास राजस्थानी मंत्री विद्यालय बीड.
-------
कोरोना नियमानुसार परीक्षा घेणे अवघडच होते. दहावीच्या निकालाबाबत बोर्डाने दिलेले हे सूत्र सर्वसामान्यांसाठी योग्य आहे. मात्र टॉपच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या सीईटीमध्येच संधी शोधावी लागणार आहे. - मनोज महाजन, सहशिक्षक, चंपावती विद्यालय, बीड.
--------
कोविडमुळे परीक्षा रद्द केल्यानंतर दहावीच्या निकालाचे शासनाने जाहीर केलेले सूत्र योग्य वाटते. यावर्षी दहावीस प्रविष्ट विद्यार्थ्यांची नववीची परीक्षा झालेली आहे, त्याचे ५० टक्के गुण घेतले जाणार आहेत. -राजकुमार कदम, उपमुख्याध्यापक , श्री शिवाजी विद्यालय, बीड.
------------
दहावीची परीक्षा घेतली असती तर अकरावीचे प्रवेश सुलभ झाले असते. बोर्डाने जाहीर केलेल्या निकाल सूत्रानुसार माझ्या मुलाला नववीमध्ये ९० टक्के गुण मिळालेले आहेत. त्यामुळे सूत्रानुसार लाभ होईल मात्र तो समाधानकारक नाही. कारण वाढत्या गुणवत्तेचा निकष महत्त्वाचा आहे. -दीपक गुंजाळ, पालक, बीड.
परीक्षा ऑफलाईन घेतल्या असत्या तर हुशार मुलांना आनंद वाटला असता. बोर्डाने ठरविलेल्या निकालाच्या सूत्रामुळे हुशार आणि कमी अभ्यासू विद्यार्थी एकाच रँकमध्ये येणार नाहीत याची दक्षता आता निकालपत्र तयार करताना घ्यावी. - दगडू खांडे,पालक,बीड.
---------
दहावीच्या निकाला संदर्भात शासनाचा नियम थोडा किचकट व विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. सातवी, आठवी, नववीचे सरासरी गुण गृहीत धरून ग्रेडिंग सिस्टिमनुसार मार्क द्यावेत. आता नवीन शैक्षणिक धोरणात ज्याला जे शिकायचे आहे ते शिकू द्यावे. - डॉ. विवेक पालवणकर, पालक, बीड.
---------
असे असेल नवे सूत्र
विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीचा विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण याप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुण , सध्या इयत्ता दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षीचा (नववीचा) निकाल कोरोनापूर्व वस्तुनिष्ठ मूल्यमापनावर आधारित आहे. सरल प्रणालीवर निकालाची नोंद आहे. नववीच्या गुणांचे प्रमाण खात्रीशीर असल्यामुळे निकालपत्र तयार करताना गैरप्रकार टळतील.
-------
पुढील प्रवेशाचे काय होणार?
कोरोनामुळे दहावीच्या परीक्षेच्या निकालाचे सूत्र निश्चित केले आहे. त्यामुळे अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी एक सामायिक परीक्षा घेऊन त्या गुणांनुसार कला, विज्ञान, वाणिज्य व इतर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात यावे, अशी सूचना पालकांमधून केली जात आहे.
----------
विद्यार्थी म्हणतात, नववीचे गुण वापरून होणारा निकाल चुकीचा वाटतो
दहावीची परीक्षा व्हायलाच हवी होती. स्वत:ला सिद्ध करता आले असते. नववीचे गुण वापरून तयार होणारा निकाल चुकीचा वाटतो. कारण दहावीची बोर्ड परीक्षा व अकरावीला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी नववीपेक्षा जास्त अभ्यास दहावीत केला. - शौर्या प्रताप काळे, बीड.
दहावीचे वर्ष असल्याने क्लास लावले होते, पालकांनी खर्च केला असल्याने मी खूप अभ्यास केला होता. नववीपेक्षा जास्त गुण मिळाले असते. दहावीची परीक्षा झाली असती तर हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान टळले असते. - राजनंदिनी ताठे, बीड.
---------
दहावी परीक्षेसाठीचे जिल्ह्यातील विद्यार्थी - एकूण ४३९८०
मुले - २२,०००
मुली - २१,९८०
----------