लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही जिरायत आहे. सर्वस्वी पावसावरच अवलंबून असणारे क्षेत्र जास्त आहे. पूरक पाणी पुरविण्याची साधने अपुरी आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पाऊस व हवामानाची प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बदलत्या हवामान परिस्थितीत ही गरज आणखी वाढली आहे.
यापुढील काळात शेती ही हवामानाचा अंदाज घेऊनच करावी, असे हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा येथे सोमवारी ग्रामस्थांनी पंजाबराव डख यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ.डख बोलत होते. संपूर्ण देशात पाऊस पडत असतो. परंतु आपल्या भागात पाऊस नक्की कधी येणार आहे याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना माहिती असायला हवी. त्यामुळे शेती करताना पेरणी वेळेवर करून शेतीच्या कामासाठी योग्य नियोजन करता येते. हवामान बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. त्यामुळे शेती करताना काही ठोकताळे असतात. त्याचा वापर करून शेती करावी. यापुढील काळात प्रत्येक शेतकऱ्याने कमीत कमी पाच झाडे लावावीत. हवामान बदलामुळे प्रत्येक वर्षी तापमानात कमी जास्त प्रमाणात वाढ होत आहे. हवामानात होणारे बदल व त्याचे परिणाम हे शेतीवर मोठ्या प्रमाणावर होत असतात. मोसमी वारे, मान्सूनचा पाऊस, चक्रीवादळ, गारपीट, याविषयी शेतकऱ्यांना डख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला डॉ. सुनील गाडे, सरपंच मधुकर गिऱ्हे, विजय शेळके, सुनील गिऱ्हे, माणिक सरोदे, दादासाहेब गाडे, शरद कुमखले, महादेव सोनवणे, मनोज सातपुते, रघुनाथ कर्डिले, भाऊसाहेब गाडे यांच्यासह गावातील तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
....
मी तीन वर्षांपासून पंजाबराव डख यांनी सांगितलेल्या हवामानाचा सखोल अभ्यास केला. आतापर्यंत त्यांनी सांगितलेला हवामान अंदाज निश्चितच चुकलेला नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या पावसाच्या अंदाजाचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झाल्याचे दिसून आले आहे.
- राजेंद्र सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.
060721\img-20210706-wa0361_14.jpg