महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:17+5:302021-07-18T04:24:17+5:30
वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात वन्यप्राणी रानडुक्कर, हरिण यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली ...

महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना
वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात वन्यप्राणी रानडुक्कर, हरिण यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे प्राणी सध्या परिसरात उभ्या असणाऱ्या ज्वारी व उसाची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. हरिणाची मोठे कळप या भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. त्यांचा पिकांवर सुरू असलेला मुक्तसंचार धोकादायक ठरू लागला आहे. या वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युतराव गंगणे यांनी केली आहे.
शहर बससेवा सुरू करा
अंबाजोगाई - अंबाजोगाई शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यशवंतराव चव्हाण चौक ते भगवानबाबा चौक असा मोठा पल्ला शहरवासीयांना पार करावा लागतो. भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या भागात स्वा. रा. ती. रुग्णालयामार्गे शहर वाहतूक बससेवा सुरू झाल्यास शहरवासीयांची मोठी सोय होणार आहे. पूर्वी सुरू झालेली ही सेवा बंद झाली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर परिसरात वनविभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरपणासाठी लोक झाडांचे फाटे तोडून येत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन व वनविभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.
नो मास्क नो एंट्री
अंबाजोगाई - विना मास्क प्रवाशांनाही ऑटो रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पूर्वी मास्क असल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना अथवा ग्राहकांना रिक्षात बसू देत नव्हते. मात्र, आता बेफिकिरी वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जोमाने असतानाही पुन्हा नो मास्क नो एंट्री ही मोहीम सुरू करून ग्राहकांना मास्कची सक्ती करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.
कमी दाबाने वीजपुरवठा, शेतकरी त्रस्त
अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणाने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण क्षमतेने व मोठ्या दाबाने विद्युतपुरवठा उपलब्ध करून दिला तर सिंचनाची गैरसोय दूर होईल.