रिकाम्या बाटल्यांमुळे डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST2021-07-28T04:35:34+5:302021-07-28T04:35:34+5:30
अंबेजोगाई : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज परिसर, रेणुकादेवी परिसर, बाराखांबी परिसर व वनविभागातील वृक्षाच्या खाली प्लास्टीकच्या ...

रिकाम्या बाटल्यांमुळे डोकेदुखी वाढली
अंबेजोगाई : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज परिसर, रेणुकादेवी परिसर, बाराखांबी परिसर व वनविभागातील वृक्षाच्या खाली प्लास्टीकच्या ग्लासांसह रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा मोठा खच पडला आहे. अनेक मद्यपी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या या परिसरात फेकून तो परिसर अस्वच्छ करू लागले आहेत. अशा मद्यपींवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होऊ लागली आहे.
कित्येक महिन्यांपासून घरकुलांचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगरपरिषदेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनही आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी, अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे, परंतु याकडे लक्ष दिलेले नाही.
नियमबाह्य वाहतुकीमुळे धोका
गेवराई : नियमबाह्य व विनापरवाना वाहतुकीचे प्रमाण अंबेजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लॉकडाऊनसारखी स्थिती असतानाही वाहने रस्त्यावर सुसाट धावत आहेत. युवक मोठ्या प्रमाणात सुसाट वाहने चालवत आहेत. परिणामी, लहान-मोठे अपघात सातत्याने घडू लागले आहेत. अशा स्थितीत युवकांवर वाहन चालविताना पोलिसांनी निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे.