बीडमध्ये आवक वाढल्याने भाज्या झाल्या मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:54 IST2017-12-12T00:54:35+5:302017-12-12T00:54:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील बाजारात मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव अत्यंत कमी असल्याने ग्राहकांना अच्छे दिन आले ...

बीडमध्ये आवक वाढल्याने भाज्या झाल्या मातीमोल
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील बाजारात मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव अत्यंत कमी असल्याने ग्राहकांना अच्छे दिन आले असलेतरी शेतक-यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. पिकविलेल्या भाज्यांना भाव कमी असुनही ग्राहकी नसल्याने दररोज ५ ते ७ टन भाजी सडते आहे. त्यामुळे व्यापा-यांनाही नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे.
येथील भाज्यांच्या आडत आणि किरकोळ बाजारात फेरफटका मारल्यानंतर भाज्यांचे भाव गडगडलेले दिसून आले. ठोक बाजारात चांगल्या प्रतीचे टोमॅटो १५० ते २०० रुपये क्रेट, वांगे १५० ते २०० रुपये क्रेट, वाटाणे २५ ते ३० रुपये किलो, लसूण १८ ते ३० रुपये किलो, आले २० ते ३० रुपये किलो, फ्लॉवर १० ते १२ आणि पत्ता कोबी १० ते १५ रुपये किलो होते. तर शेवगा ५० ते ७०, गवारी ३० ते ३५ रुपये किलो, दोडके २० ते ३० रुपये किलोे भाव होते. तर हलक्या प्रतीच्या भाज्यांचे दर कमी होते.
किरकोळ बाजारात साधारण प्रतीच्या मालाचे अत्यंत कमी भाव दिसून आले. यात टोमॅटो १० ते २० रुपये किलो, वांगे १० रुपये किलो, मिरची १० ते २० रुपये काकडी ५ ते १० रुपये किलो दराने विकली. यामुळे शेतकºयांच्या पदरी घोर निराशाच आली. तर सकाळपासून दुपारपर्यंत भाजी विकून जाणा-या शेतक-यांना सायंकाळपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, करडईची जुडी एक रुपयांना एक प्रमाणे होती. पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव घसरल्याचे किरकोळ विक्रेते रमजान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कांद्याचे भाव स्थिर
बाजारात कांद्याचे भाव टिकून आहेत. २५ ते ३० रुपये किलो ठोक तर ४० रुपये किलो किरकोळ भाव आहेत. आग्रा येथील बटाट्याचे ठोक भाव ६०० ते ८०० रुपये क्विंटल तर किरकोळ भाव १० रुपये किलो प्रमाण होते.
शेतकरी - विक्रेत्यांना फटका
येथील भाजी आडत बाजारात दररोज ३० ते ४० टन भाज्यांची आवक होत आहे. उठाव नसल्याने भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. रोज जवळपास ५ ते ७ टन खराब झालेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ येते. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांनाही फटका बसत आहे.