पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश; संतोष देशमुखांची मुलगी वैभवी होणार डॉक्टर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:54 IST2025-06-16T15:53:38+5:302025-06-16T15:54:29+5:30
पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे.

पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश; संतोष देशमुखांची मुलगी वैभवी होणार डॉक्टर!
केज (जि. बीड) : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने १२वी विज्ञानच्या यशानंतर नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. आता ती वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी अनेक राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आणि पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. तिच्या दृष्टीने हे यशही अतुलनीय असून तिचे आणि तिच्या वडिलांचे डॉक्टर होण्याचे प्रयत्न होणार आहेत. खासगी महाविद्यालयात तिला एमबीबीएसला प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण जिवाचे रान करणार असल्याची माहिती वैष्णवीचे चुलते धनंजय देशमुख यांनी दिली. वैभवीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केल्याने तिचे कौतुक होत आहे.
विराज, सत्यजितचा सांगलीत प्रवेश
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व मुलगा विराज यांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, संभाजीराजे आदींनी घेतलेली आहे. तसेच शुक्रवारी धनंजय देशमुख यांचा मुलगा सत्यजित व विराज यांचा प्रवेश रेठरेधरण (जि.सांगली) येथील सैनिकी विद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवादही साधला होता.
मुलीला डॉक्टर करण्याचे स्वप्न
आपली मुलगी वैभवी ही डॉक्टर व्हावी, यासाठी संतोष देशमुख यांनी तिला लातूरमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. अधून-मधून ते तिला भेटायला जात असत. अखेर संतोष देशमुख यांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. आता तिला कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.