पीकविम्यासाठी वंचित शेतकरी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:50+5:302021-08-28T04:37:50+5:30
परळी : बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सादर केलेल्या २१ हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तरीही ...

पीकविम्यासाठी वंचित शेतकरी एकवटले
परळी : बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सादर केलेल्या २१ हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तरीही बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत.
सन २०२० चा पीक विमा मंजूर करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ वाटप करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवारी (दि. ३०) पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती कॉ. अजय बुरांडे यांनी दिली.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २०२० च्या पीक विम्यापोटी ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनीकडे विमा हप्ता भरलेला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल दिला होता. त्या अहवालामुळेच शेतकऱ्यांना पीक नुकसानीचे अनुदान मिळालेले आहेत. बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सादर केलेल्या २१ हजार शेतकऱ्यांना १३ कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे. तरीही हे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत.
सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा देण्यात यावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणाऱ्या अव्यवहार्य अटी, शर्तींचा फेरविचार करून शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळण्यास सुलभ करावी, या दोन मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येो मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन किसान सभेचे कॉ. अजय बुरांडे, कॉ. पी. एस. घाडगे, कॉ. दत्ता डाके, कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. मोहन लांब, कॉ, बालासाहेब कडभाने, कॉ. काशीनाथ सिरसाट, कॉ. सुभाष डाके यांनी केले आहे.