बीड : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून मल्टीस्टेटवाल्यांचा बाजार उठला आहे. लोकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या. याच ठेवींवर अध्यक्षांसह संचालक मंडळाने मौजमजा केली. जेव्हा लोकांनी ठेवी परत मागितल्या त्यावेळी त्यांनी पळ काढला. बीडमध्ये अशी एक-दाेन नव्हे, तर डझनभर उदाहरणे आहेत. अशातच गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेटमध्ये ठेवलेले कष्टाचे पैसे न मिळाल्याने सामान्य शेतकरी असलेल्या ठेवीदाराने मल्टीस्टेटच्या दारातच गळफास घेतला. मल्टीस्टेटवाले आणखी किती बळी घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शासन, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ठेवीदारांमधून केली जात आहे.
जिल्ह्यात ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी, माँ साहेब जिजाऊ या मोठ्या मल्टीस्टेटमध्ये लोकांनी कोट्यवधी रुपयांच्या कष्टाच्या ठेवी ठेवल्या. काहींनी मुलांचे शिक्षण तर काहींनी मुला-मुलींच्या लग्नाचे नियोजन म्हणून हे पैसे मल्टीस्टेटमध्ये ठेवले. परंतु, या चारही मल्टीस्टेटच्या अध्यक्षांनी या पैशांचा गैरवापर करून तो दुसरीकडेच गुंतवला. त्याचे नियोजन केले नाही. त्यामुळे ठेवीदारांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना देता आले नाहीत. सुरुवातीला काही दिवस लोकांनी अध्यक्षांचे ऐकले; पण नंतर त्यांचा विश्वास उडाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने न्यायालयात धाव घेत आदेश आणले. त्यानंतर गुन्हे दाखल झाले. हे अजूनही अखंडितपणे सुरूच आहे. गुन्हे दाखल होत असले तरी पैसे मिळण्याच्या आशा धूसर होत चालल्या आहेत. आमचे कष्टाचे पैसे परत कधी मिळतील, या आशेने ठेवीदार आला दिवस काढत आहेत.
हे चार लोक निघाले ‘फ्रॉड’लोकांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या. परंतु, ज्ञानराधाचा अध्यक्ष सुरेश कुटे, राजस्थानीचा चंदुलाल बियाणी, साईरामचा शाहिनाथ परभणे, माँ साहेब जिजाऊचा बबन शिंदे हे मोठे चार लोक सर्वांत जास्त ‘फ्रॉड’ निघाल्याचा आरोप ठेवीदार करीत आहेत. यांच्याशिवाय लक्ष्मीमाता अर्बन, महात्मा फुले नागरी बँक, मुक्ताई, गंगाभारती या मल्टीस्टेटवाल्यांनीही फसवणूक केलेली आहे.
‘ज्ञानराधा’ तपास सीआयडीकडेज्ञानराधा मल्टीस्टेटचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून काढून घेत तो आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. याचा अध्यक्ष सुरेश कुटे हा कारागृहात आहे. त्याची पत्नी अर्चना कुटेसह इतर आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून अर्चना कुटेला पोलिसांनी सोडले होते. तेव्हा तिच्यावर सात गुन्हे दाखल होते. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला होता.
छत्रपती मल्टीस्टेटवरही गुन्हा दाखलचे आदेशगेवराईतील छत्रपती मल्टीस्टेटच्या दारात सुरेश जाधव या शेतकऱ्याने ठेवी न दिल्याने गळफास घेतला. दोन दिवसांपूर्वीच या मल्टीस्टेटवर गुन्हा दाखलचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. परंतु, अद्यापही त्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, आत्महत्यास जबाबदार धरून अध्यक्ष संतोष भंडारी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
साईरामच्या ३, माँ साहेब जिजाऊच्या ४, राजस्थानीच्या दोनसह इतर काही प्रकरणांत चार्जशिट गेले आहे. तसेच एमपीआयडी प्रस्तावही दाखल केलेले आहेत. इतरांचीही प्रक्रिया सुरू आहे. आमच्या शाखेत सध्या अंदाजे २५ ते २७ गुन्हे तपासावर आहेत.- संतोष शेजूळ, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड