मजुरांच्या हाताला काम देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:41+5:302021-05-24T04:32:41+5:30

बीड : तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात ...

Demand for work in the hands of laborers | मजुरांच्या हाताला काम देण्याची मागणी

मजुरांच्या हाताला काम देण्याची मागणी

बीड : तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्याने शहरी भागातील कामेही बंद झाली आहेत. कामच नसल्यामुळे अनेक कुटुंबांचे रोजगाराअभावी हाल सुरू आहेत. यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांमधून केली जात आहे.

बँड चालकांच्या अडचणीत वाढ

बीड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालय बंद ठेवण्यात आल्यामुळे अनेकांनी बुकिंग केलेले बँड पथकही रद्द केले आहे तर होणारी लग्नही पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीत होत असल्याने गाजावाजा न करता, लग्न होऊ लागल्याने बँडवाल्यांना बोलावले जात नाही. त्यामुळे बँड पथकातील कामगार संकटात सापडले आहेत.

लॉकडाऊन न करता पर्यायी मार्ग काढा

माजलगाव : लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत होते. अनेक उद्योगधंदे ठप्प पडतात. व्यापाऱ्यांना दुकानभाडे, वीज बिल, कामगारांचा पगार दुकान बंद असले तरीही द्यावा लागतो. लॉकडाऊन झाले तर अनेकजण रोजगारापासून वंचित होतील. त्यामुळे लॉकडाऊन न करता, यातून पर्याय काढावा. हॉटेल बंद केल्याने मंदीत असलेला हा व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनवर पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी होत आहे.

रस्त्याची रखडलेली कामे पूर्ण करावी

बीड : शहरातील अनेक भागात रस्ता अटल अमृत योजनेतील कामे, नळ जोडण्याची कामे अपूर्ण स्थितीत असून, याचा सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. पालिका प्रशासनाने ही कामे तत्काळ पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. पालिकेने शहरात विविध विकासकामे हाती घेतली आहेत. मात्र, यातील अटल अमृत योजनेतील काही कामे प्रलंबित आहेत. अद्याप काही भागांत नळ जोडणींची कामे झालेली नाहीत. ही कामे गतीने करावीत, जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होणार नाही, अशी मागणी होत आहे.

मास्कची चढ्या भावाने विक्री

अंबाजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एकतर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कच्या किंमतीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.

Web Title: Demand for work in the hands of laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.