लसीकरणाने मृत्यू, वांझ होण्याची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:28+5:302021-06-01T04:25:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा कायम आहे. आगोदरच तुटवडा त्यात ग्रामीण भागात लसीकरणाबाबत विविध अफवांना ...

लसीकरणाने मृत्यू, वांझ होण्याची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत !
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा कायम आहे. आगोदरच तुटवडा त्यात ग्रामीण भागात लसीकरणाबाबत विविध अफवांना पेव फुटले आहे. लसीकरणानंतर मृत्यू होतो, वांझपणा येतो, अशा अफवा पसरत आहेत. या अफवा दूर करताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. सुरुवातीच्या काळात या अफवा जास्त होत्या. परंतु आता या कमी झाल्या असून, लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. माध्यमांसह आरोग्य विभागाकडून जनजागृती केल्याने नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर झाल्याचे दिसते.
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ८५ हजार १६६ लोकांना कोराेना लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ९३ हजार ४७४ एवढी आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांचा आकडा ९१ हजार ६९२ एवढा आहे. सुरुवातीच्या काळात लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही केवळ चुकीच्या अफवा आणि मनातील गैरसमजामुळे लसीकरण कमी प्रमाणात झाले होते. आता या अफवा बंद झाल्या असून, लस नसल्याने लसीकरण थांबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
...
काय आहेत अफवा
अशी आहे पहिली अफवा
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला. २०२२ साली ज्या लोकांनी लस घेतली आहे, ते सर्वच मरणार. परंतु काही वेळातच हा मेसेज फेक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. त्यामुळे शांतता राहिली.
...
अशी आहे दुसरी अफवा
लस घेतल्यानंतर लकवा येतो, चालता येत नाही, ताप येतो, डोके जड पडते अशा अफवा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. सुरुवातीच्या काळात यामुळे लोक कमी पुढे आले. परंतु आता या अफवा थांबल्या आहेत.
...
अशी आहे तिसरी अफवा
लस घेतल्यानंतर वांझ होण्याची भीती असते, अशाही काही अफवा ग्रामीण भागात पसरल्या होत्या. परंतु याला जास्त दिवस थारा मिळाला नाही. माध्यमे आणि आरोग्य विभागाने तत्काळ जनजागृती करून त्या दूर केल्या.
...
अधिकाऱ्यांनी स्वत:चे फोटो केले व्हायरल
लसीकरणाच्या सुरुवातीच्या वेळेस लोकांच्या मनात खूप जास्त गैरसमज होते. अगदी हेल्थ वर्कर्सही लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते. ताप येणे, डोके दुखणे, थकवा येणे अशा अफवा पसरत होत्या. तसेच लस प्रभावी नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे सुरुवातीला लसीकरणाचा टक्का खूपच कमी होता. परंतु नंतर आरोग्य विभागासह इतर व्हीआयपी लोकांनी लस घेऊन फोटो व्हायरल केले. त्यानंतर लोकांना याबद्दल विश्वास बसला. आता सर्वांच्या मनातील गैरसमज दूर झालेले आहेत. माध्यमांद्वारेही आरोग्य विभागाने जनजागृती केली होती. आता लोक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे दिसते.
...
अधिकारी म्हणतात....
सुरुवातीला ताप येणे, डोके दुखणे अशा अफवा होत्या. परंतु आता त्या बंद झाल्या आहेत. माध्यमांसह आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती केली आहे. दोन दिवसांपूर्वी चुकीचा मेसेज व्हायलर झाला होता, परंतु तो फेक असल्याचे जाहीर केले.
-डॉ. एल. आर. तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा