मृत्युसत्र थांबेना; आरोग्य विभाग सुस्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:48+5:302021-05-24T04:32:48+5:30
बीड : कोरोनाबाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे, तरीही आरोग्य विभाग केवळ बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगत उपाययोजना करण्यात सुस्तच असल्याचे ...

मृत्युसत्र थांबेना; आरोग्य विभाग सुस्तच
बीड : कोरोनाबाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे, तरीही आरोग्य विभाग केवळ बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगत उपाययोजना करण्यात सुस्तच असल्याचे दिसत आहे. रविवारी जिल्ह्यात चोवीस तासांतील २३ व जुन्या १९ अशा ४२ मृत्यूची नोंद झाली. तसेच नवे ९६२ रुग्ण निष्पन्न झाले. ९७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात शनिवारी तब्बल ८ हजार ९२९ जणांची चाचणी केली गेली. त्याचे अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले. यात ९६२ नवे रुग्ण आढळले, तर ७ हजार ९६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ६४, आष्टी ८३, बीड २६८, धारुर ८१, गेवराई ८८, केज ८९, माजलगाव ४७, परळी २६, पाटोदा ७८, शिरूर १०९ व वडवणी तालुक्यातील २९ जणांचा समावेश आहे. तसेच ९७४ जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले. दरम्यान, मागील चोवीस तासांत २३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर जुन्या परंतु पोर्टलवर अपडेट झालेल्या १९ अशा एकूण ४२ मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८१ हजार १८४ झाली असून, कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ७३ हजार ५२२ इतका झाला आहे. आतापर्यंत १८६१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या ५ हजार ८०१ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी. के. पिंगळे यांनी दिली.
बैठका नको, उपाययोजना करा!
जिल्ह्यात दररोज कोरोनाबळी वाढत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक त्यांची यंत्रणा केवळ हे मृत्यू रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. नुसत्या बैठका आणि आढावा घेतल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात उपाययोजना होत नसल्याचे मृत्युसत्र थांबत नसल्याचे दिसते. त्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
निष्क्रिय कारभारामुळे महसूलची यंत्रणा कार्यान्वित
जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आणि निष्क्रिय कारभारामुळेच जिल्हाधिकारी यांनी स्वत:ची यंत्रणा रुग्णालयात कामाला लावली आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार स्वत: रोज आढावा घेऊन सूचना करत आहेत. विशेष म्हणजे सूचना करूनही यात सुधारणा केल्या जात नाहीत. त्यामुळे सीईओंनीदेखील आपली जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लावली आहे.