रसायनयुक्त पाणी शेतात सोडल्याने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST2021-09-10T04:41:08+5:302021-09-10T04:41:08+5:30

गेवराई : रसायनयुक्त पाणी शेतामध्ये सोडल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून जिनिंगच्या पाच जणांविरुद्ध गेवराईत हवा प्रदूषण, पर्यावरण संरक्षण ...

Crop damage due to release of chemical water in the field | रसायनयुक्त पाणी शेतात सोडल्याने पिकांचे नुकसान

रसायनयुक्त पाणी शेतात सोडल्याने पिकांचे नुकसान

गेवराई : रसायनयुक्त पाणी शेतामध्ये सोडल्याने पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून जिनिंगच्या पाच जणांविरुद्ध गेवराईत हवा प्रदूषण, पर्यावरण संरक्षण व जलप्रदूषण अशा तीन कायद्यांनुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई येथील रहिवासी महेश शिवाजीराव बरगे यांची बागपिंपळगाव शिवारातील सर्व्हे नंबर १६४ मध्ये जमीन आहे. त्यांच्या शेतजमिनीलगत कालिका फायबर्स जिनिंग चालकाने रसायनयुक्त पाणी शेतात सोडून दिले. तेच पाणी त्याच्या शेतविहिरीतून पिकांना देण्यात आले. त्यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा प्रकार २०१९ पासून ते २०२१ पर्यंत सुरू होता. अखेर ६ सप्टेंबर रोजी शेतकरी महेश बरगे यांच्या फिर्यादीवरून जिनिंग मालक निलेश मोहनलाल तायल, शामसुंदर मोहनलाल तायल दोघे रा. औरंगाबाद, मुनीम लक्ष्मण दिनकर शिंगणे, ग्रेडर ओमप्रकाश रामचंद्र अग्रवाल व व्यवस्थापक शाम बद्रीप्रसाद शर्मा तिघे रा. बागपिंपळगाव अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल देशमुख करीत आहेत.

Web Title: Crop damage due to release of chemical water in the field