कोरोना मृत्यूच्या तांडवाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राखेचे ढिगारे; रक्ताचे नातेही गोठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:15+5:302021-05-25T04:37:15+5:30
अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोरोनाने गेल्या दीड वर्षात सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अंबाजोगाईत गेल्या ११ महिन्यांत आठशेहून अधिक ...

कोरोना मृत्यूच्या तांडवाने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राखेचे ढिगारे; रक्ताचे नातेही गोठले
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : कोरोनाने गेल्या दीड वर्षात सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. अंबाजोगाईत गेल्या ११ महिन्यांत आठशेहून अधिक कोरोनाने मृत्यू झाले आहेत. त्यात वयोवृद्ध, तरुण. तर कांही चिमुकल्यांचाही समावेश आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर राखेचे ढिगारे जिकडे तिकडे दिसत आहेत. रक्ताचे नातेही गोठले असून, राख सावडण्यासाठी नातेवाईक पुढे येत नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेचे कर्मचारीच राखेची विल्हेवाट लावतात.
कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो. गेल्या ११ महिन्यांपासून हे पथक अंत्यविधीचे काम करीत आहे. अंत्यसंस्कारासाठी वेटिंग होती. मात्र, आता मृत्युदर कमी झाल्याने अंत्यविधीही घटले आहेत. एकाच दिवशी ३२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची दु्र्देैवी वेळ ही येऊन गेली. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा कहर कमी झाला आहे. परंतु, स्मशानात मात्र राखेचे ढिगारे साचत आहेत. त्यामुळे या ठिकाणचेच कर्मचारीच राखेची विल्हेवाट लावतात.
कोरोनामुळे रक्ताची नाती गोठली आहेत. अनेकजण तर अंत्यसंस्काराला येण्यासही नकार देत आहेत. अशाही स्थितीत नगरपरिषदेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. अनेकदा नातेवाईक अस्थी घेऊन जाण्यासाठीही येत नाहीत. या अस्थीचे विसर्जनही पालिका कर्मचारीच करतात.
अशी लावली जाते राखेची व्हिलेवाट
मृत कोरोना व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर जमलेल्या राखेच्या ढिगाऱ्यातील अस्थी मागणाऱ्या नातेवाइकांना दिल्या जातात. नंतर ही राख अग्निशामकाच्या पाण्याच्या पंपाद्वारे जवळच असलेल्या खड्यात भरली जाते. एक खड्डा भरला की दुसरा जेसीबीच्या साहाय्याने केला जातो. नंतर तो परिसर सॅनिटायझर करून स्वच्छ केला जातो. पाण्यामुळे ती राख दबली जाते. तो खड्डा पुन्हा काही दिवसांनंतर मातीच्या साहाय्याने बुजविण्यात येतो.
स्वतंत्र स्मशानभूमी
कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांसाठी अंबाजोगाई शहरापासून पाच कि.मी. अंतरावर मांडवा रोड परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी निर्माण करण्यात आली आहे. मोठे शेड बांधण्यात आले असून, एकाचवेळी १५ ते २० जणांवर अंत्यसंस्कार होतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना बाधित होऊन मृत पावलेल्या ८०० रुग्णांवर आजपर्यंत याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले आहेत.
अस्थींचे असे होते विसर्जन
कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या अस्थी मागितलेल्या नातेवाइकांना दिल्या जातात. जे नातेवाईक येत नाहीत त्या अस्थींचे कर्मचारीच विसर्जन करतात.
काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
१) कोरोनाने सर्वांनाच हैराण करून सोडले आहे. दररोज डोळ्यासमोर मृतदेह जळताना दिसत आहेत. पूर्वी दिवसात तीन ते चार जणांवर अंत्यसंस्कार व्हायचे. आता १५ ते २०जणांवर होतात. स्मशानभूमीत कायम आग धगधगत असल्याचे पाहून मन खिन्न होते.
- रणधीर सोनवणे
२) वर्षभरात पूर्वी जेवढे अंत्यसंस्कार होत होते. तेवढे आता एका महिन्यात होत आहेत. दररोज मृतांवर अंत्यसंस्कार होताना पाहून मन विचलित होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अनेकदा स्वछता करताना राख उडते; पण आता कामाची सवय झाली आहे.
- लक्ष्मण जोगदंड
३) अंबाजोगाईत कोरोनावरील उपचारांसाठी दूर दूरहून लोक येतात. त्यांना अंत्यविधीची जागाही लवकर सापडत नाही. स्मशानभूमीकडे आल्यानंतर इथली अवस्था पाहून अनेकांचे मन हेलावून जाते. आम्हालाच नातेवाईक समजून त्यांना धीर द्यावा लागतो.
- शेख जावेद