पावसाने ओढ दिल्यामुळे वनराई वाचवण्याचे वन विभागापुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:31 IST2018-10-01T00:31:20+5:302018-10-01T00:31:53+5:30
राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे लावलेली झाडे वाचवण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे राहिले आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे वनराई वाचवण्याचे वन विभागापुढे आव्हान
प्रभात बुडूख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य शासनाचे यंदा १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी बीड जिल्ह्यात ३३ लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त वृक्ष लगवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे लावलेली झाडे वाचवण्याचे आव्हान वनविभागापुढे उभे राहिले आहे.
जुलै महिन्यातील पावसाच्या आधारावर दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जादा वृक्षांची लागवड वनविभागाच्या वतीने करण्यात आली आहे. मागील तीनही वर्षांत बीड जिल्ह्याने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहज पूर्ण केले आहे. जून, जुलै महिन्यातील झालेल्या पावसानंतर जिल्हाभरातील डोंगररांगांवर झाडे लावण्याची मोहीम राबवली होती.
उद्दिष्टपूर्तीसाठी वनविभागासह शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेतल्याने ते पूर्ण झाले. या वृक्ष लागवडीमुळे बोडख्या डोंगररांना हिरवा शालू घातल्याचे स्वरुप आले होते. वनविभागाने पोषक वातावरण व मृदेची प्रत पाहूनच विविध झाडांची लागवड केली होती. यामुळे झाडांची मुळे लवकरात लवकर जमिनीत रुजली. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्यावाचून झाडे जळण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध माध्यमातून झाडे ठिकवण्यासाठी वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न होत आहेत.
वन विभागाच्या उपाययोजना
रोपांची लागवड केल्यानंतर जवळपास ४५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रोपे सुकू लागली आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठवण्यासाठी वन विभागाच्या वतीने पाणवठे तायर केले होेते. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यावर तुषर सिंचन, सौरपंपाचा वापर करुन पाणी देण्याचे काम सुरु आहे. जिथे याची सोय नाही त्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे, रोपांजवळ ओलावा टिकून राहण्यासाठी मातीचा भर देण्याचे काम सुरु आहे.