दिवसा घरात घुसून चोरी; पण पोलिसांच्या हाती लागेना संशयाची दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:25+5:302021-07-24T04:20:25+5:30

कडा : सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतातील पिके खुरपणीला आल्याने लहान थोरांसह इतर मजूर घेऊन कुटुंबातील सदस्य ...

Burglary during the day; But the rope of suspicion did not fall into the hands of the police | दिवसा घरात घुसून चोरी; पण पोलिसांच्या हाती लागेना संशयाची दोरी

दिवसा घरात घुसून चोरी; पण पोलिसांच्या हाती लागेना संशयाची दोरी

कडा : सध्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, शेतातील पिके खुरपणीला आल्याने लहान थोरांसह इतर मजूर घेऊन कुटुंबातील सदस्य शेतात जातात. मग हिच संधी साधून सराईत चोरटे बंद घराचे कुलूप तोडून भर दिवसा चोऱ्या करत असताना त्या संशयित चोरीची दोरी इतका सुगावा पोलिसाच्या हाती लागत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

आष्टी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चिंचपूर येथील शरद गोंदावले याच्या घरी ७ जुलै रोजी घरी कोणी नसल्याची संधी साधून भरदिवसा घरात घुसून

घरातील पाच तोळे सोने व एक लाख साठ हजार रोख तर अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुंभेफळ येथे १९ जुलै रोजी भर दुपारी योगेश सुभाष गाडे याच्या घरी कोणी नसल्याचे पाहून आठ तोळे सोने व एक लाख रुपये रोख असा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे आठ दिवसांच्या फरकाने हे चोरीचे प्रकार घडल्याने व पोलिसांना अद्याप कसलाच मागमूस लागला नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रात्री-अपरात्री नव्हे तर भरदिवसा चोरटे चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करत असताना पोलिसांना चोर आव्हान देतात की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एवढे होऊनही भरदिवसा घरात घुसून चोरी होत असताना पोलिसांना थोडी देखील संशयाची दोरी हातात लागत नाही हे विशेष म्हणावे लागेल.

तालुक्यात आजवर अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्या चोरीचा तपास बोटावर मोजण्या इतकाच लागला आहे. आता तर भरदिवसा चोऱ्या होत असल्याने पोलिसांचा वचक आणि गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी शिवसंग्राम तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.

अन्य तीन ठिकाणीही चोऱ्या पण ठाण्यात तक्रार नाही.

याच आठवड्यात मेहकरी, सराटेवडगांव, टाकळी अमिया या ठिकाणी देखील दिवसाच चोऱ्या झाल्या आहेत. पण या लोकांनी संबंधित पोलीस ठाण्यात कसलीच तक्रार दाखल केली नाही. दिवसा घरफोडीचे सत्र कधी थांबणार व चोरटे पोलिसांना सापडतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, ठाणे हद्द परिसरात नाकाबंदी, गस्त, त्याचबरोबर कोम्बिग ऑपरेशन मोहीम हाती घेतली असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Burglary during the day; But the rope of suspicion did not fall into the hands of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.