२ वर्षात ५ मुले जन्मली लठ्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:27+5:302021-03-06T04:31:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्हा रुग्णालयात मागील दोन वर्षांत पाच नवजात मुले लठ्ठ जन्माला आली आहेत. आरोग्य विभागाकडून ...

२ वर्षात ५ मुले जन्मली लठ्ठ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयात मागील दोन वर्षांत पाच नवजात मुले लठ्ठ जन्माला आली आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांची काळजी घेण्यात आली. सुरुवातीचे ४८ तास काळजी घेऊन तज्ज्ञांच्या निगराणीत बाळाला ठेवले जात आहे. मुल लठ्ठ जन्मले तरी यात घाबरण्याची काहीही गरज नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जिल्हा रुग्णालयात २०१९ - २०मध्ये ८ हजार ९३५ महिलांची प्रसुती झाली. यातील ५ हजार ७५५ नॉर्मल, तर ३ हजार १८० महिलांचे सिझर झाले. या वर्षात चार मुले लठ्ठ जन्माला आली. तसेच २०२० - २१मध्ये प्रसुतीचा आकडा कमी होऊन ६ हजार ५९४ एवढा झाला. यात ४ हजार ५६७ नॉर्मल, तर २ हजार २७ सिझर झाले आहेत. या वर्षात केवळ एकच मुल लठ्ठ जन्माला आले आहे. ४ किलो वजनापेक्षा जास्त असलेल्या मुलाला लठ्ठ समजले जाते. असे असले तरी योग्य ती काळजी घेऊन या बाळांवर उपचार केले जातात. तसेच आईलाही काळजी घेण्याबाबत सांगितले जाते. त्यामुळे दुर्दैवी घटना घडत नाहीत.
एसएनसीयू विभागात उपचार
ज्या मुलांचे वजन चार किलोपेक्षा जास्त आहे, अशा नवजात बालकांना तत्काळ एसएनसीयू विभागात दाखल केले जाते. येथे बालरोगतज्ज्ञ व परिचारिकांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जातात.
आईनेही काळजी घेण्याची गरज
आईला डायबीटीज अथवा इतर आजार असल्यास जास्त वजनाचे बाळ जन्मण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आईने गरोदरपणात काळजी घेण्याची गरज आहे. तसेच वेळोवेळी तपासणी करून आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
४८ तास निगराणीत
आईला डायबीटीज अथवा हायपोथायरॉडीझम आजार असल्यास जास्त वजनाचे बाळ जन्मण्याची शक्यता असते. असे असले तरी प्रकृती पाहून सुरुवातीचे ४८ तास काळजी घेण्याची गरज आहे. बाळ निगराणीत असते.
- डॉ. विजय विघ्ने
बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड