पुरवठ्यासाठी १२० टॅँकर सज्ज, उद्भव मात्र कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:35 IST2019-03-04T00:34:37+5:302019-03-04T00:35:10+5:30
आष्टी तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले, तलाव आटले असून, पाण्याची समस्या भेडसावत आहे.

पुरवठ्यासाठी १२० टॅँकर सज्ज, उद्भव मात्र कोरडेठाक
कडा : आष्टी तालुक्यात यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले, तलाव आटले असून, पाण्याची समस्या भेडसावत आहे.
तालुकावासियांची मदार सध्या टँकरवर असली तरी पाण्याचे उद्भव आटले असून, पाणीपुरवठा करताना प्रशासनासमोर संकट ओढवले आहे. सध्या १२० टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी उद्भव नसल्याने जनतेवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने त्वरित पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
सध्या मेहकरी, नागतळा, सीना याच तलावात थोड्या फार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे. तर दादेगाव, उंदरखेल, वेलतुरी हे दिलेले उदभव पूर्णपणे आटले आहेत. प्रशासनाने टँकर जरी दिले असले तरी उद्भव नसल्याने अनेक गावांतील लोकांना पाणी मिळत नसल्याने महिला व शाळकरी मुलीना परीक्षा काळात देखील पाण्यासाठी शिवार पालथे घालण्याची वेळ आली आहे. जर उद्भवात पाणीच नाही तर प्रशासनाने उद्भव देऊन जनतेची चेष्टा केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी होणारे हाल थांबवण्यासाठी तत्काळ पर्यायी उद्भव द्यावेत, अशी मागणी होत आहे.
केवळ तीन उद्भवातच पाणीसाठा शिल्लक
आष्टी पंचायत समितीने दुष्काळी परिस्थितीत जनतेची पाण्याविना हाल होऊ नयेत यासाठी सहा उद्भव दिले असले तरी दादेगाव, वेलतुरी, उंदरखेल ही जलस्रोत कोरडेठाक असून, फक्त नागतळा, सिना आणि मेहकरी या तीनच उद्भवात पाणीसाठा शिल्लक आहे. पर्यायी उद्भव मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी केली असल्याची माहिती बीडीओ आप्पासाहेब सरगर यांनी दिली.