आवर्तनाच्या हमीशिवाय उन्हाळी पीकपेरणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:05 AM2021-03-01T04:05:02+5:302021-03-01T04:05:02+5:30
औरंगाबाद : खरीप, रब्बीनंतर आता उन्हाळी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बीडमध्ये १६८९ हेक्टर तर ...
औरंगाबाद : खरीप, रब्बीनंतर आता उन्हाळी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बीडमध्ये १६८९ हेक्टर तर जालना जिल्ह्यात ६३३ हेक्टर उन्हाळी पिकांची लागवड झाली आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात उन्हाळी पिकांच्या उगवणीची अद्याप नोंद नाही. चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठे तुडुंब असले तरी आवर्तनाची सोय तिथेच तिसऱ्या हंगामाचा पर्याय शेतकऱ्यांना निवडलेला दिसून येत आहे.
या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला. सध्या विहिरी, शेततळ्यांत चांगला साठा असला तरी यावर उन्हाळी पेरणीची हिंमत शेतकऱ्यांतून केली गेलेली नाही; तर आवर्तनाची हमीची सोय असेल तिथे मात्र, उन्हाळी पेरणी जोरात असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक उन्हाळी पेरणी झाली. मात्र, अद्याप उगवणीची नोंद कृषी विभागाकडे झालेली नाही. गव्हाच्या काढणीलाही सुरुवात झाली असून मोठे क्षेत्र असलेल्या ठिकाणी हार्वेस्टरची मदत घेतली जात आहे. बीड जिल्ह्यात ७० हेक्टरवर उन्हाळी मका, ९२८ हेक्टरवर उन्हाळी तृणधान्य, १११ हेक्टरवर कडधान्ये, ५७८ हेक्टरवर उन्हाळी भुईमुगाची पेरणी झाली; तर जालना जिल्ह्यात २८९ हेक्टरवर उन्हाळी मका, ६१ हेक्टर तृणधान्य, २७६ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे सरासरी पेरणीक्षेत्र शून्य दाखविण्यात आले असून, उगवणीनंतर नोंदणी होण्याची शक्यता कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात उन्हाळी भाजीपाला क्षेत्र असून त्यांची गावनिहाय माहिती संकलन सध्या सुरू आहे.