Maharashtra Election 2019 : व्हिजन असल्यामुळेच शेती, उद्योगांच्या समस्या सोडविल्या : कल्याण काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 03:55 PM2019-10-14T15:55:32+5:302019-10-14T15:59:42+5:30

मागील पाच वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधीला सर्वोच्च पद मिळाले असताना केवळ व्हिजन नसल्यामुळेच मतदारसंघात विकासाचे चाक गाळात रुतले

Maharashtra Election 2019 : Vision solves problems of agriculture, industry: Kalyan Kale | Maharashtra Election 2019 : व्हिजन असल्यामुळेच शेती, उद्योगांच्या समस्या सोडविल्या : कल्याण काळे

Maharashtra Election 2019 : व्हिजन असल्यामुळेच शेती, उद्योगांच्या समस्या सोडविल्या : कल्याण काळे

googlenewsNext
ठळक मुद्दे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारउद्योगवाढीसाठी प्रयत्न करणारभाजपला समाजाशी देणे-घेणे नाही

- राम शिनगारे 

औरंगाबाद : फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधित्व करताना शेतीसाठी धरणांची निर्मिती आणि उद्योग उभारणीला प्राधान्य दिले. युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयची स्थापना केली. तहसील, कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर प्रशासकीय इमारतींची उभारणी केली. लोकप्रतिनिधी म्हणून एक व्हिजन होते. त्यानुसार काम केले. मात्र, मागील पाच वर्षांत विद्यमान लोकप्रतिनिधीला सर्वोच्च पद मिळाले असताना केवळ व्हिजन नसल्यामुळेच मतदारसंघात विकासाचे चाक गाळात रुतले असल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी केला.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला  सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. फुलंब्री हा मतदारसंघ मुळात काँग्रेसच्या विचारांचा आहे. काँग्रेसची पाळेमुळे या मतदारसंघात घट्ट रुजलेली आहेत.  दहा वर्षे आमदार असताना रचनात्मक काम केले. मागील पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसतानाही जनतेच्या हितासाठी सतत लढा उभारला. काँग्रेसचे संघटन बळकट करण्याचे काम केले. याचा फायदा आता होत आहे. काँग्रेस पक्ष संपला असे १९७८ सालीही सांगण्यात आले होते. 

१९९९ लाही असाच दावा केला जात होता. मात्र, कॉंग्रेस हा अनेक वर्षांची परंपरा असलेला आणि स्वातंत्र्य चळवळीत अमूल्य योगदान दिलेला पक्ष आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जागा वाटपांमध्ये थोडीशी गडबड झाली. मित्रपक्षांना जागा सोडण्याचा निर्णय घेतला होता. तरीही जिल्ह्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास काँग्रेसच प्रथमस्थानी राहील, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील काही नेते ऐन निवडणूक काळात पक्ष सोडून गेले. असे असले तरी पक्षाला काहीही फरक पडणार नाही. कारण काँग्रेस पक्षाचे स्वत:चे मतदार आहेत. ते कोणत्याही नेत्यांचे नाहीत. त्यामुळे नेत्याने पक्ष सोडला तरी मतदार कायम असतात, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

विभाजनावरच विरोधकांना यश
काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले तेव्हा हरिभाऊ बागडे विजयी झाले आहेत. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले. मात्र यावेळी काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत आहे. मागील वेळी पराभूत झाल्यानंतरही पाच वर्षांच्या काळात कधीही मतदारसंघातील जनसंपर्क कमी होऊ दिला नाही. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. 

शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या 
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास त्यांच्यासोबत रात्री, अपरात्री धावून जाण्याचे काम केले. बोंडअळी, पीकविम्याचे पैसे मंजूर केले नव्हते. तेव्हा विधिमंडळात काँग्रेसचे तत्कालीन आमदार अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. एवढे होऊनही फुलंब्री तालुका बोंडअळीच्या अनुदानातून वगळला तेव्हा विराट मोर्चा काढून शासनाला जाब विचारण्याचे कामही केले. विरोधकांची भूमिका शंभर टक्के बजावल्यामुळे आता मदत होत असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

प्रत्येक गावाला सभा मंडप देत शाश्वत विकास साधला
आपल्या दहा वर्षांच्या कालखंडात प्रत्येक गावात सभा मंडप दिला. ज्या ठिकाणी दिला नव्हता त्याठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधींनी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही त्यांना यश मिळाले नाही. आघाडीचे सरकार असताना निल्लोड, वाकोद, फुलंब्री येथील धरणांचे बांधकाम केले. गिरिजा नदीवर कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची निर्मिती केली. फुलंब्री शहरासह ग्रामीण भागातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआयला मंजुरी मिळवली. फुलंब्री आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना याच एमआयडीसीमध्ये रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र, तेव्हा विद्यमान लोकप्रतिनिधींनी यासाठी विरोध केला होता. लोकप्रतिनिधी म्हणून निवडलेले हरिभाऊ बागडे यांना विधानसभा अध्यक्षपद मिळाले. हे सर्वोच्च पद असतानाही त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नसल्यामुळे शेंद्रा एमआयडीसीत एकही नवीन कंपनी आली नाही. 

शैक्षणिक क्रांती घडविण्याचा संकल्प
फुलंब्री मतदारसंघात सिंचनाच्या सुविधांवर अधिक काम करण्याची गरज आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारल्याशिवाय शेतीमालाला चांगला दर मिळणार नाही. याविषयीचे प्रकल्प मतदारसंघात, शेंद्रा एमआयडीसीमध्ये आणावे लागतील. या उद्योगांमध्ये स्थानिकांना ७५ टक्के प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. या कंपन्यांमध्ये रोजगारासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.  जि.प.च्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न आगामी काळात केले जाणार आहेत.   जि.प.च्या शाळा दहावीपर्यंत झाल्या पाहिजेत, यासाठी गावातील नागरिकांचा सहभाग अधिक महत्त्वाचा आहे. यादृष्टीने विकासाचे व्हिजन तयार केलेले आहे. यातून शैक्षणिक क्रांती घडेल.

चिकलठाणा गावातील रस्ता चौपदरी केला
चिकलठाणा गावातून जालना, बीडकडे जाणारा रस्ता अरुंद होता. रस्ता रुंदीकरणासाठी गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन धार्मिक ठिकाणे हटवली. याठिकाणी चार पदरी रस्ता केला. याच रस्त्याच्या कडेला जागा रिकामी होती. त्याठिकाणी मिनी घाटीसारखे रुग्णालय उभारण्याचे काम केले.च्हे सिव्हिल हॉस्पिटल असताना फुलंब्री मतदारसंघात खेचून नेण्याचे काम केले. यासाठी लोकप्रतिनिधीला व्हिजन लागते. मात्र, विद्यमान लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे मिनी घाटीचे उद्घाटन रखडले होते. ते शिवसेनेने गुपचूप करून घेतले. विधानसभाध्यक्षांना हर्सूल गावातील होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविता आला नाही, अशी टीकाही डॉ. काळे यांनी केली.

भाजपला समाजाशी देणे-घेणे नाही
भाजपला समाजातील शेतकरी, शेतमजूर यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. जनतेमध्ये मिसळण्याची प्रवृत्ती भाजपच्या नेतृत्वात नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. काश्मिरातील ३७० कलम रद्द केल्याचे दाखले आता निवडणुकीत द्यावे लागत आहे. त्या दाखल्यामुळे फुलंब्री मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. या मतदारसंघात २०० छोटी, मोठी गावे आहेत. याशिवाय शहरातील दहा वॉर्डही आहेत. मात्र, दोन्ही ठिकाणच्या नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यात भाजपला अपयश आल्याचेही डॉ. काळे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Vision solves problems of agriculture, industry: Kalyan Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.