पाणीपुरवठ्याची चुकीची कामे, चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:20 IST2021-02-23T04:20:02+5:302021-02-23T04:20:02+5:30
अमरावती: मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गत काही वर्षांत काही गावांत करण्यात आलेल्या चुकीच्या कामांमुळे पाणीटंचाईची समस्या डोके ...

पाणीपुरवठ्याची चुकीची कामे, चौकशीचे आदेश
अमरावती: मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यातील गत काही वर्षांत काही गावांत करण्यात आलेल्या चुकीच्या कामांमुळे पाणीटंचाईची समस्या डोके वर काढत असल्याने सोमवारी जिल्हा परिषदेची ऑनलाईन सभा या विषयावर चांगली गाजली. दरम्यान, यासंदर्भात अध्यक्ष बबलू देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरवर्षी मेळघाटातील काही गावात उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. यानुसार पाणीपुरवठा विभागाकडून टंचाईग्रस्त गावांत उपापयोजना केल्या जातात. मात्र, उपाययोजना करताना संबंधित गावातील पाणीस्त्रोत असताना याऐवजी दुसऱ्या गावातील जलस्त्रोतामधून पाणीपुरवठ्याकरिता पाच किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकण्यात आल्याचा मुद्दा सभापती दयाराम काळे यांनी सभेत उपस्थित केला. यासंदर्भात त्यांनी धारणी तालुक्यातील टिटंबा व सावऱ्या या दोन्ही गावांत पाणीस्त्रोत आहेत. मात्र, संबंधित गावातील स्त्रोतावरून पाणीपुरवठा न करता टिटंब्याला सावऱ्यावरून आणि सावऱ्याला टिटंब्यावरून पाणीपुरवठ्याकरिता पाईपलाईन टाकण्यात आली. तेही जवळचे सोडून दूरवरून पाईपलाईन टाकण्यामागील पाणीपुरवठा विभागाचा उद्देश काय, असा सवाल करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. याशिवाय कारदा ते गांगखेडा,कोयलारी ते पाचडोंगरी या गावांना डोमा गावावरून पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली असताना वरील गावांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. झापल ग्रामपंचायत क्षेत्रातील बारूगाव आणि भुलोरी या ठिकाणीही पाणीटंचाईची कामे केली मात्र याचा फायदा झाला नाही. परिणामी टंचाईची समस्या आतापासूनच भेडसावत आहे. मेळघाटातील पाणीपुरवठ्याच्या कामांची पदाधिकाऱ्यांनी मांडलेली अवस्था ऐकून अध्यक्षांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश सीईओंना दिले आहेत. याशिवाय सायन्सस्कोअर मैदानाचे काम सिमेंट, विटामध्ये केले आहे. सदर काम विटामध्ये करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले असताना ते काम थांबविले का नाही,सदर काम किती टक्के झाले आहे. याबाबतचा अहवाल अध्यक्षांनी मागविला आहे. तोपर्यंत देयके देवू नयेत अशी बांधकाम विभागाला सूचना दिली आहे. यावेळी सभेला अध्यक्ष बबलू देशमुख,उपाध्यक्ष विठ्ठल चव्हान, सभापती बाळासाहेब हिंगणीकर,दयाराम काळे, सदस्य रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, प्रताप अभ्यंकर, नितीन गोंडाणे, शरद मोहोड, प्रकाश साबळे, राजेंद्र बहूरूपी, सीईओ अमोल येडगे, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात आदी उपस्थित होते.
बॉक्स
बांधकामच्या अधिकाऱ्यांना सुनावले
समृध्दी महामार्गाच्या कामामुळे धामणगाव,चांदूर रेल्वे,नांदगाव तालुक्यांतील अनेक गावांना जोडणारे झेडपीच्या मालकीचे रस्ते खराब झाले आहेत. मात्र, या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत बांधकाम विभागाने तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अध्यक्षांनी बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, हा अहवाल सादर करण्यात न आल्याने कार्यकारी अधिकारी अभियंत्यांना सुनावत तातडीने अहवाल सादर करण्याचे पुन्हा निर्देश दिले आहेत.