शाळा सुरू झाल्यात, महाविद्यालये केव्हा उघडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST2021-02-05T05:31:48+5:302021-02-05T05:31:48+5:30
विद्यार्थी संघटनांचे आंदोलन, कॉलेज उघडण्याच्या तारखेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष अमरावती: कोरोना संसर्गाच्या आलेखात चढ-उतार होत असताना इयत्ता पाचवी ते बारावीचे ...

शाळा सुरू झाल्यात, महाविद्यालये केव्हा उघडणार?
विद्यार्थी संघटनांचे आंदोलन, कॉलेज उघडण्याच्या तारखेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
अमरावती: कोरोना संसर्गाच्या आलेखात चढ-उतार होत असताना इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. मात्र, जिल्ह्यातील महाविद्यालये बंदच आहेत. नवीन वर्षात जानेवारीपासून ती उघडतील, अशी अपेक्षा होती. आता महाविद्यालये केव्हा सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे. अभाविपने मंगळवारी ‘महाविद्यालये उघडा’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गामुळे महाविद्यालये बंद आहेत. शिक्षणक्षेत्रात हा मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक उपक्रम, परीक्षा, अभ्यासक्रम आदी विस्कळीत झाले आहे. २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. तेव्हापासून शाळेची पहिली घंटा वाजली. आता २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट पाहावयास मिळत आहे. मात्र, अद्यापही महाविद्यालये बंदच आहे. हिवाळी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या असून, उन्हाळी २०२१ परीक्षांचा पत्ता नाही. विद्यापीठाने चालू शैक्षणिक सत्र जाहीर केले असले तरी त्याचा पुरता बाेजवारा उडाला आहे. पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे कोरोना नियमावलींचे पालन महाविद्यालयाचे विद्यार्थी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. असे असताना नेमकी महाविद्यालयेच बंद का, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
---------------------
एकृूण महाविद्यालये - ११८
एकूण विद्यार्थी- ९८, ७७५
-------------------
शैक्षणिक नुकसानाला जबाबदार कोण?
कोरोनामुळे गत १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे मिळत असले तरी विज्ञान व अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. विद्यार्थी हे महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
--------------------
कोट
महाविद्यालये सुरू होणे आता काळाची गरज झाली आहे. किती दिवस शिक्षणापासून विद्यार्थी दूर राहतील, हादेखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष शिकवणीसाठी महाविद्यालये सुरू करण्यासाठी ‘महाविद्यालये उघडा’ हे आंदोलन करण्यात आले.
- रवि दांडगे, अभाविप.
---------
कोट
यूजीसीच्या निर्देशानुसार कॉलेज, विद्यापीठाचे शिक्षण सुरू करणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना अगोदरच निवेदन सादर केले आहे. शासन जर सर्व काही सुरू करण्यावर भर देत असेल, तर महाविद्यालये, विद्यापीठच बंद का? त्यामुळे महाविद्यालये लवकर सुरू व्हायला हवीत.
- योगेश चव्हाण, एआयएसएफ.
--------------------
कोट
१० महिन्यांपासून घरी असल्याने कंटाळा आला आहे. वर्गात शिक्षण घेण्याचा वेगळा अनुभव येतो. आता महाविद्यालये सुरू झाले पाहिजे. उन्हाळी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा आहे. परीक्षांचा ताण आला आहे. महाविद्यालये लवकर सुरू झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.
- पूजा रोकडे, विद्यार्थिनी, बडनेरा.
-----
कोट
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होत आहे. गत १० महिन्यांपासून महाविद्यालये बंद आहे. नवीन शैक्षणिक सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा आहे. परीक्षा, निकालाची काळजी आहे. आता महाविद्यालये सुरू झाली पाहिजे. शासनाने त्यादिशेने सकारात्मक विचार करावा.
- निखिल गोरे, विद्यार्थी, मोर्शी
------------------------