लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १२ व १३ नोव्हेंबर रोजी शहरात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आंदोलक व हल्लेखोरांचे अटकसत्र राबविण्यात आले. त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्याने शहर पूर्वपदावर आले असून, अमरावतीकरांना 'आम्ही आहोत, तुम्ही निर्धास्त राहा', असा आश्वासक संदेश देण्यासाठी सीपी, डीसीपी व एसीपींनी गुरुवारी रात्री शहरात पायदळ गस्त घातली. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीने आवश्यकतेप्रमाणे संचारबंदीत सूट देण्यात येत आहे. मात्र, रात्री सक्त संचारबंदी कायम ठेवण्यात आलेली आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीनी शुक्रवारी रात्री ११ वाजता दरम्यान पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, डीसीपी विक्रम साळी, एसीपी पूनम पाटील व भारत गायकवाड यांच्यासह ठाणेदारांनी संचारबंदीचा आढावा घेतला. पोलीस बदोबस्त अलर्ट आहे किंवा नाही याची पाहणी केली. पेट्रोलिंग दरम्यान राजकमल चौक, गांधी चौक, हनुमाननगर, माता खिडकी, पटवा चौक, पठाण चौक, चांदणी चौक, हाथीपुरा, सक्करसाथ, शनीमंदिर, ट्रान्सफोर्टनगर, भाजी बाजार, रतनगंज, मसानगंज, नागोबा ओटा परिसरात पायदळ पेट्रोलिंग करून पाहणी केली. संबंधित भागातील परिस्थितीची माहिती जाणली. बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोस्तादरम्यान आर्म ॲम्युनेशनसह हजर राहण्याच्या सूचना दिल्या.
सध्या शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातर्फ घेण्यात येत असलेल्या मोहल्ला कमिटी, कॉर्नर मीटिंगला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, रात्रीच्या संचारबंदीदरम्यान नेमकी कशी परिस्थिती आहे, ती जाणून घेण्यासाठी अधिनस्थ यंत्रणेला सोबत घेऊन पायदळ गस्त घातली.- डॉ. आरती सिंह,पोलीस आयुक्त