धामणगाव तालुक्यात दोन सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; शेतकऱ्यांना मिळणार अखंडित वीजपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:26 IST2025-06-30T17:25:44+5:302025-06-30T17:26:24+5:30
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा

Two solar power projects operational in Dhamangaon taluka; Farmers will get uninterrupted power supply
मोहन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व योग्य दाबाचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून सौरऊर्जा प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. डिसेंबर २०२४ ते आजपर्यंत तालुक्यात दहा मेगावॉट क्षमतेचे दोन प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांद्वारे अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे राज्यात प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत वीज उपकेंद्राच्या ५ किमी परिघातील जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. यातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दिवसा वीज मिळणार असली तरी पाण्याचा उपसा मर्यादित ठेवण्याची गरज आहे.
असे आहेत प्रकल्प
धामणगाव तालुक्यात दाभाडा, नारगावंडी, जुना धामणगाव येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राअंतर्गत ३० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
मंगरूळ, देवगाव परिसरातील शेतकऱ्यांना मिळतेय वीज
जळगाव येथून मंगरूळ दस्तगीर उपकेंद्र, तर उसळगव्हाणमधून देवगाव अशा दोन उपकेंद्रांतून निघणाऱ्या कृषी वीज वाहिन्यांवरील अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. दिवसा वीजपुरवठा होत असल्यामुळे शाश्वत शेती करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे पूर्णत्वास आले आहे. महावितरणच्या उपकेंद्रांतील फिडरद्वारे परिसरातील कृषिपंपांना दिवसा पुरवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जलदगतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
"धामणगाव मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती आली आहे. सध्या दोन प्रकल्पांमधून अडीच हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे."
- प्रताप अडसड, आमदार, धामणगाव रेल्वे
"आमच्या भागात सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झाल्याने आम्हाला दिवसा विजेचा वापर मिळत आहे. आ. प्रताप अडसड यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला ही वीज मिळत आहे."
- साहेबराव पाटील, शेतकरी, कावली