ऐकावे ते नवलच! म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 10:03 IST2017-12-11T09:59:07+5:302017-12-11T10:03:11+5:30
अस्वलाने पशुपालकावर हल्ला चढविताच चरत असलेल्या म्हशींनी एकत्र येऊन परतीचा हमला केला व पशुपालकाचा जीव वाचविला.

ऐकावे ते नवलच! म्हशींनी वाचविले मालकाचे प्राण
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आजपर्यंत पाळीव कुत्र्याने वा मांजरीने मालकाचे प्राण वाचविल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या वा वाचल्या असतील. या मुक्या जनावरांना माणसाप्रमाणेच भावना असतात याचाही आपण अनुभव घेतला असतो. म्हणूनच म्हणतात ना माणसापेक्षा मुके प्राणी बरे, त्याचा काहीसा प्रत्यय रविवारी सकाळी ८ वाजता मेळघाटच्या जंगलात आला. परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मेळघाटलगतचा पशुपालक ठाक्या गायन (४० रा.कुकरू मध्यप्रदेश) हा आपल्या १५ ते २० म्हशी चराईसाठी रविवारी सकाळी सात वाजता जंगलात घेऊन गेला. म्हशी चरत असताना ठाक्या गायनवर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाने ठाक्याचे पोट पकडून डोक्याला चावा घेतला. त्यामुळे ठाक्या जोर-जोराने ओरडू लागला. त्याच्या आवाजाने म्हशी सैरावैरा पळू लागल्या. गावशिवारातील जंगलात सदर प्रकार घडल्याने ग्रामस्थांना समजताच धाव घेऊन अस्वलीला पळवून लावले. अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी ठाक्याला भाऊ पंढरी गायन यांनी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. घंटाग ते काटकुंभ रस्त्यावर कुकरू हे मध्यप्रदेशातील गाव आहे. रविवरच्या या घटनेने परिसरात अस्वलाची दहशत पसरली आहे.