अमरावती : मेळघाटवासीयांना पाणीटंचाईतून मुक्तता, पर्यटनस्थळाला चालना मिळण्यासाठी व स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी चिखलदरा येथील ब्रम्हसती प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार नवनीत रवि राणा यांनी लोकसभेत जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे नुकतीच केली.
अमरावती जिल्ह्यात पेढी, टाकळी कलान, चंद्रभागा, भागडी, सामदा, बगाडी, वाघाडी, वासनी, करजगाव, उमा बॅरेज, राजुरा, शहानूर, व बोरनदी प्रकल्पांध्ये शेतकºयांच्या जमिनी गेल्या, त्यांना आजच्या दरापेक्षा दोनच्या गुणकाप्रमाणे भाव देण्याबाबत, तसेच धरणांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनेच्या दृष्टीने ठरावीक कालावधीत बांधकामाचे कडक आदेश कंत्राटदारांना देण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. यातच चिखलदरा येथील ब्रम्हसती धरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी केली.
सदर कामातून जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, परतवाडासह मेळघाटातील चिखलदरा, धारणी तालुक्यातील आदिवासांची पिण्याच्या पाण्याची, सिंचनाची, रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होणार असल्याचा मुद्दा लोकसभेत उचलून धरला.