एक उड्डाणपुल बांधायला सहा वर्षे ! नागरिक त्रस्त बडनेऱ्यातील लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:33 IST2026-02-18T18:31:18+5:302026-02-18T18:33:59+5:30
Amravati : तब्बल सहा वर्षापासून जुना बायपास मार्गावर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या या कामाला कायम निधीचा अडथळा येत आहे.

Six years to build a flyover! Will the public representatives of Badnera pay attention to the citizens' suffering?
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : तब्बल सहा वर्षापासून जुना बायपास मार्गावर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सुरू असलेल्या या कामाला कायम निधीचा अडथळा येत आहे. संथ कामामुळे शहराच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. लोकांना प्रचंड मनस्ताप देणारी ही समस्या खा. बळवंत वानखडे यांच्या नजरेस येईल काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.
जुन्या वस्तीपासून जवळच बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी २०२० मध्ये नव्याने उड्डाणपूल उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. प्रत्यक्ष २०२१ मध्ये कामाला सुरुवात झाली. ६५० मीटरच्या उड्डाणपुलासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर झाला. अनेक अडथळ्यांतून तयार होत असलेल्या या उड्डाणपुलाला निधीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अत्यंत तुटक निधी मिळत असल्याने वर्षभरापासून अंतिम टप्प्यातील कार्य संथगतीने सुरू आहे.
महारेलकडे जबाबदारी
महारेलकडे या रेल्वे उड्डाणपुलाची प्रमुख जबाबदारी आहे. काम ढिसाळ सुरू असल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. दोन खासदारांच्या कार्यकाळात तयार होत असलेल्या आणि तरीही अर्धवट असलेल्या उड्डाणपुलाचे काम तत्काळ पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी आहे.
मोबदला कमी
जमिनीचे हस्तांतरण प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरदेखील चार वर्षांपर्यंत चालले. रस्त्यालगतच्या जमिनीला अत्यल्प मोबदला मिळाल्याचा संताप अद्यापही जमीन देणाऱ्यांमध्ये आहे.
आधी फ्लाय अॅशचे कारण, आता निधीचा ब्रेक...
अडीच महिन्यांपूर्वी ब्रेक लागलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी फ्लाय अॅश मिळत नसल्याचे सांगण्यात आले होते. आता तुटपुंजा निधी मिळत असल्याचे कारण पुढे आले आहे. अजून १०० डम्पर अॅश उड्डाणपुलाच्या उतारात भरण्यासाठी लागणार आहे. तेव्हा कामाला अजून किती वेळ लागेल, हे सांगणे कठीण आहे. याचा याच वाटेने ये-जा करणारे विद्यार्थी, एमआयडीसीतील कामगार, गावखेड्यांवरील नियमित कामकाजासाठी शहरात येणाऱ्या वाहतूकदारांना मोठा मनस्ताप होत आहे.