आता निकाल लागताच थेट मोबाइलवर येईल मेसेज; अमरावती विद्यापीठाचा 'हायटेक' निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 19:27 IST2026-04-07T19:26:53+5:302026-04-07T19:27:39+5:30
Amravati : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल लागला की नाही, यासाठी आता विद्यार्थ्यांना सायबर कॅफे किंवा महाविद्यालयाच्या चकरा मारण्याची गरज उरणार नाही.

Now, as soon as the results are out, a message will be sent directly to the mobile; Amravati University's 'hi-tech' decision
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठाच्या परीक्षेचा निकाल लागला की नाही, यासाठी आता विद्यार्थ्यांना सायबर कॅफे किंवा महाविद्यालयाच्या चकरा मारण्याची गरज उरणार नाही. विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांच्या थेट मोबाइलवर निकालाचा मेसेज आणि लिंक पाठविण्याची महत्त्वपूर्ण सुविधा सुरू केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू झालेल्या या संकल्पनेमुळे पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांतील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची धाकधूक कमी होणार आहे.
विशेष म्हणजे, सध्या सुरू असलेल्या हिवाळी परीक्षांच्या निकालांचे मेसेज विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येण्यास सुरुवात झाली आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी घरबसल्या एका क्लिकवर आपला गुणतक्ता (मार्क शिट) पाहू शकणार आहेत.
कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठात विविध कामे हे पारदर्शकपणे होण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केला आहे. परीक्षा विभागाला डिजिटल हायटेक करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे.
अशी आहे कार्यप्रणाली:
थेट मेसेज: निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएस प्राप्त होतो.
डिजिटल लिंक: मेसेजसोबत एक अधिकृत लिंक दिली जाते, ज्यावर क्लिक करताच निकाल ओपन होतो.
वेळेची बचत : विद्यापीठाच्या सर्व्हरवर एकाच वेळी येणारा ताण कमी होऊन विद्यार्थ्यांना त्वरित निकाल मिळतो.
महत्वाचे ठळक मुद्दे
सुविधाः निकाल जाहीर होताच क्षणार्धात मोबाईलवर अलर्ट.
वर्षः शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून अंमलबजावणी.
व्याप्तीः पाचही जिल्ह्यांतील सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी लागू,
फायदाः अफवांना चाप बसणार आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार.
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांना लाभ
अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या अडचणीमुळे किंवा निकालाची माहिती उशिरा मिळाल्यामुळे अनेकदा अडचणी येत होत्या, मात्र आता थेट मेसेज सुविधेमुळे पारदर्शकता आणि वेग वाढला आहे.
परीक्षार्थीचा आकडा मोठा
या शैक्षणिक वर्षात हिवाळी आणि उन्हाळी सत्रात मिळून लाखो परीक्षार्थी विद्यापीठाच्या परीक्षेला बसतात. हिवाळी परीक्षा २०२५-२६ च्या सत्रात सुमारे २.५ लाख ते ३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, टप्प्याटप्प्याने त्यांचे निकाल याच डिजिटल पद्धतीने जाहीर केले जात आहेत. निकालासोबतच पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपीसाठी अर्ज करण्याच्या लिंकही उपलब्ध करून देण्याचा मानस विद्यापीठाचा आहे.
कुलगुरूचे 'व्हिजन'
विद्यापीठाला पूर्णतः डिजिटल आणि विद्यार्थीभिमुख बनवण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली आहे. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून निकालाची प्रक्रिया वेगवान करण्यावर भर देण्यात आला आहे.
"पुर्नमूल्यांकनाचे एसएमएस पाठवणे सुरू झाले आहे. येत्या सत्रापासून नियमित विद्यार्थ्यांना परीक्षांच्या निकालाचे एसएमएस आणि लिंक पाठवली जाईल. पुढे हीच प्रणाली देखील सुरू असेल."
- डॉ. नितीन कोळी, संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ.