गुढीपूजनासाठी नटली अंबानगरी
By Admin | Updated: March 28, 2017 00:02 IST2017-03-28T00:02:59+5:302017-03-28T00:02:59+5:30
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो.

गुढीपूजनासाठी नटली अंबानगरी
मराठी नववर्षारंभ : घरोघरी तयारी, तरुणाई उत्साहात
अमरावती : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुलिंबाच्या डाखळीने सजलेली गुढी दारोदारी उभारुन नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. पारंपारिक वेशभूषेत नटून-थटून मराठमोळ्या पद्धतीने मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरूणाईचा उत्साह यंदा ओसंडून वाहताना दिसतोय. याच उत्साहाचे पडसाद बाजारपेठेतही उमटले आहेत. बाजारपेठेतील लगबग शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.
मराठी नववर्षाचा पहिला महिना म्हणजे चैत्र. उन्हाने यंदा कहर केलाय. चैत्रातच उकाडा असह्य होतोय. मात्र, असह्य तापमानात सुद्धा बाजारपेठेत गर्दी दिसून येत असून विधिवत गुढी पूजनाकरिता आवश्यक पूजा सामुग्रीच्या खरेदीची गृहिणींची लगबग चालली आहे.
गुढीला पारंपारिक नऊवार, कोल्हापुरी नथ आणि इतर सौभाग्य साज चढवून नटविण्याचा भारीच उत्साह महिलांमध्ये दिसून येत पारंपारिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सरसावलेल्या विविध संघटनांच्या सदस्यांची भगवे फेटे खरेदी करण्यासाठी गर्दी उसळत आहे. तरूणाईची गर्दी झाली आहे. गुढी पाडव्याची पहाट उगवणार ती पावित्र्य, आनंद, उत्साह आणि जल्लोषाची गुढी घेऊनच. (प्रतिनिधी)
८.२७ मिनिटांनंतर करावी गुढीची पूजा
शके १९३९ या नूतन वर्षारंभी २८ मार्च रोजी मंगळवारी सूर्यादयानंतर सकाळी ८.२७ वाजेपर्यंत अमावस्या आहे. प्रतिपदेची समाप्ती २९.४५ वाजता म्हणजेच बुधवारी सूर्योदयापूर्वी पहाटे ५.४५ वाजता असल्यामुळे प्रतिपदेचा क्षय आहे. म्हणून २८ मार्च रोजी मंगळवारी सकाळी ८.२७ वाजतानंतर म्हणजे (अमावस्या समाप्तीनंतर) नेहमीप्रमाणे गुढी उभारून तिचे आणि पंचांगस्थ श्री गणपतीचे पूजन करावे, अशी माहिती ब्राह्मण वैभव श्रीराम कुळकर्णी यांनी दिली.
नैसर्गिक महत्त्व
गुढी पाडव्याच्या आसपास वसंत ऋतुला सुरु होते. यावेळी समशितोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते, शिशीर ऋतुत झाडांची पाने गळून गेलेली असतात आणि पानगळती संपलेली असते तर दुसरीकडे झांडाना नवी पालवी येत असते. अशा आनंददायी वातावरणात येतो गुढीपाडव्याचा सण. यामुळेच या सणाचे आगळे महत्त्व आहे. नैसर्गिक पार्श्वभूमीही आहे.
शुभेच्छांची देवाण-घेवाण
गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षानिमित्त पाच दिवस आधीपासूनच शुभेच्छांचे आदान-प्रदान सुरू झाले आहे. सोशल मिडियावरून तर शुभेच्छांचे सुंदर संदेश नातेवाईक व मित्र मंडळींना पाठविले जात आहेत. यात आकर्षक मजकूर टाकून पारंपारिकता जपण्यासाठी कल्पकता पणाला लावल्याचेही दिसून येते.