कोट्यवधीचे संत्रापीक बुडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:50 IST2019-03-26T22:49:58+5:302019-03-26T22:50:18+5:30
आंबिया बहर : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड इंदल चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड ...

कोट्यवधीचे संत्रापीक बुडण्याच्या मार्गावर
आंबिया बहर : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड
इंदल चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड कोसळल्याने यावर्षी आंबिया बहराची उत्पादित होणाऱ्या संत्राफळांची कोट्यवधींची उलाढाल प्रभावित होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्याकरिता सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात पपई, आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, केळी या फळबागांची लागवड करण्यात येते. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र संत्रापिकाचे असून, येथील संत्री चवीने गोड असल्याने विविध राज्यांत मोठी मागणी आहे. वरूड, मोर्शी, अंजनगाव, अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात ६ हजार ५०० हेक्टरमध्ये संत्राबागा मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या आंबिया बहराची संत्राफळे बाल्यावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज भासत आहे. मात्र, परिसरातील पाण्याची पातळी १२ फूट खाली गेल्याने या फळबागांना दुष्काळाचा फटका बसत आहे. यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. अल्प पावसामुळे फळबागांवर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बोअरवेल, विहिरींना कोरड पडल्याने जिल्ह्यातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील फळबागांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत फळबागा वाचविणे कठीण झाले आहे. अशा संकटकाळातही काही शेतकरी विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. चांदूर बाजार, वरूड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतकरी फळबागांमधून लागलेला खर्चही निघाला नसल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.
मृगाच्या संत्रा उत्पादनात कोट्यवधीची तूट
मृग बहर आला तेव्हा जेमतेम स्थितीत शेतकऱ्हानी पाण्याची सोय केली होती. त्यामुळे मृग बहराची संत्राफळे आली; मात्र कोळशी, फायटोप्थोरा व डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळे काही प्रमाणात सडलीत. काहींची वाढ खुंटली, तर काही फळे मलूल पडली. त्यामुळे बाजारपेठेत भाव मिळू शकला नाही. त्यातही व्यापाºयांनी एकी करून तोकड्या भावात बगीचा मागितला. त्यामुळे ट्रक भरून संत्री बंगळुरु, हैद्राबादला पाठवावे लागले. मात्र, तेथेही किमान भाव मिळाला.
उन्हामुळे संत्रा झाडे वाळली
वाढत्या उन्हामुळे संत्राझाडे वाळत आहे. झाडावर आंबिया बहर फुटला आहे. पाण्याअभावी उष्णतेचे प्रमाण वाढल्याने तसेच विहिरी व बोअर आटल्याने पाण्याची मात्रा वेळेत बसत नाही. त्यामुळे मूग, हरभराच्या आकाराची झालेली संत्राफळे मोठ्या प्रमाणात गळत आहेत. परिणामी संत्रा बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. पूर्वीचेच कर्ज फेडणे शक्य नसताना, आणखी कर्जाचा डोंगर हा शेतकरी कसा सहन करणार, असा प्रश्न मोर्शी तालुक्यातील काटपूर धामणगाव येथील शेतकरी विश्वासराव देशमुख यांनी केला. संत्र्याची अनेक झाडे उन्हामुळे वाळली असून, ती कुऱ्हाडीने तोडण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही.
येथे जातात संत्राफळे
जिल्ह्यातील संत्राफळ चवीने गोड असल्याने नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, केरळ, हैद्राबाद, बैंग्लोर आदी ठिकाणी विशेष मागणी आहे. हंगामात २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने ट्रकद्वारे परराज्यात पोहचविले जातात. एका ट्रकमध्ये ४२० कॅरेट संत्राफळे बसतात. एका कॅरेटचे वजन २३ किलो असतो. एक ट्रक संत्राफळे ६० हजारांत विक्री होते.
यावर्षी पोषक वातावरणामुळे फलधारणा चांगली झाली. पण, पाण्याचा अभाव व वाढते तापमान पाहता पिकेल किती, हा यक्षप्रश्न आहे. जमिनीत सध्या आर्द्रता अत्यल्प व तापमान ४० अंशाच्या वर असल्याने छोटी फळे टिकाव धरू शकणार नाही.
- रमेश जिचकार, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी लि. वरूड