केवायसी चुकीची दुरुस्ती; लाडक्या बहिणींना ३१ ची मुदत; या चुकांमुळे बंद झाला होता लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:42 IST2026-03-24T17:41:09+5:302026-03-24T17:42:00+5:30
Amravati : लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

KYC mistake corrected; 31st deadline for beloved sisters; Benefits were closed due to these mistakes
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. अशा महिलांना आता दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. संबंधित लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी ही दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर अर्जदारांनी ई-केवायसी पूर्ण केली असली, तरी काही महिलांनी माहिती चुकीची भरल्याने किंवा निकषांबाबत गोंधळ झाल्याने त्यांचे अर्ज अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आता या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील अनेक बहिणींना दिलासा
जिल्ह्यातील हजारो महिलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणीचा लाभ रखडा होता. परिणामी शासनाने नव्या मुदतवाढीमुळे या महिलांना आता थकीत हप्त्यांसह पुढील लाभमिळण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून पात्र महिलांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
या चुकांमुळे बंद झाला होता लाभ
अनेकांनी ई-केवायसी करताना 'नाही' ऐवजी 'हो' असा चुकीचा पर्याय निवडला होता. तसेच आधारकार्ड आणि बैंक खात्यावरील नावातील तफावत, बँक खाते डीबीटीसाठी सक्रिय नसणे यासारख्या तांत्रिक त्रुटींमुळे लाभ मिळणे बंद झाले होते.
ई-केवायसी करताना ही काळजी घ्यावी
महिलांनी ई-केवायसी करताना स्वतःचा अचूक आधार क्रमांक द्यावा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही शेअर करू नये. तसेच बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री बँकेत जाऊन करणे आवश्यक आहे.
तांत्रिक चुकांचा फटका
योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात घाईगडबडीत अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते. विशेषतः बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा माहिती चुकीची भरली जाणे, यामुळे लाखो महिलांचे हप्ते थांबले होते. आता या महिलांना माहिती अद्ययावत करण्याची शेवटची मुभा दिली आहे.
ई-केवायसीसाठी संधी
ज्या लाभार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहेत किंवा ज्यांचा लाभ बंद झाला आहे, त्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची तारीख आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याने महिलांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय लाभ मिळणार नाही.
कोणत्या लाभार्थ्यांना ई-केवायसीची मुभा ?
महिलांचे अर्ज मंजूर असूनही खात्यात पैसे जमा झाले नाहीत, ज्यांच्या अर्जात बँक माहितीची त्रुटी आहे किंवा ज्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा महिलांना ही दुरुस्ती करता येईल.
कशामुळे हप्ता बंद, कुठे कळणार?
लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन तपासता येईल. तसेच अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपला हप्ता का थांबला आहे, याची खात्री करता येईल.
अशी घटत गेली लाभार्थीची संख्या
दुसरीकडे, निकषात बाद ठरल्याने अपात्र महिलांची संख्याही वाढली आहे. सुरुवातीला नोंदणीकृत महिलांची संख्या मोठी होती, मात्र कडक पडताळणी, प्राप्तिकर भरणारे कुटुंब आणि ई-केवायसीमधील त्रुटींमुळे लाभार्थ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात घटला आहे.