अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला आलेल्या अडचणी, नव्याने उभाराव्या लागलेल्या बाबी आदींचा अभ्यास करून यापुढे साथींच्या नियंत्रणासाठी सुसज्ज कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले आहेत.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल, सीईओ अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, आयएमएचे अध्यक्ष अनिल रोहणकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील साथीची तीव्रता, त्यापासून होणारी हानी रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. चाचणी, उपचार, मार्गदर्शन, लोकशिक्षणाबाबत कायमस्वरूपी यंत्रणा सर्वत्र उभारावी. यात ग्रामीण आरोग्य यंत्रणाही बळकट व्हावी. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांत अद्ययावत सुविधा उभाराव्यात. चाचणी प्रयोगशाळांचेही अद्ययावतीकरण करावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी तपासण्यांची संख्या वाढवावी. त्याचप्रमाणे, लसीकरणाचा विस्तारही होणे आवश्यक आहे. व्यक्तीला आपल्या चाचणीचे निष्कर्ष वेळेत कळावेत, यासाठी एसएमएस सुविधा सुरू केली आहे. मात्र, ती खंडित होता कामा नये. लसीकरणाबाबत नोंदणी केलेल्या व्यक्तींना जाणाऱ्या संदेशातही अचुकता व स्पष्टता नसल्याबाबत तक्रारी आल्या आहेत, असे होता कामा नये. संपर्क यंत्रणा सुरळीत, सुस्पष्ट, जलद व अचूक असावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी शुक्रवारी दिले.
बॉक्स
उपचारानंतरही दक्षता महत्त्वाची
कोरोनाबाधितांना उपचारानंतराअंती घरी सोडण्यात येते. मात्र, उपचारानंतरही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्या दक्षता, समुपदेशनासाठी यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे, याबाबत बरे झालेल्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी, फिजिओथेरपी, मेडिटेशन याबाबत स्वतंत्र सुविधा दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.