...अखेर दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर सरन्यायाधीश ‘चार्टर प्लेन’ने संभाजीनगरकडे रवाना
By गणेश वासनिक | Updated: June 27, 2025 14:24 IST2025-06-27T14:23:39+5:302025-06-27T14:24:52+5:30
बेलोरा विमानतळावरील ‘एटीसी’कडून ‘होल्ड’: दृश्यमानता अयोग्य असल्याने जिल्हा प्रशासनाची तारांबळ

...Finally, after a two-hour wait, the Chief Justice left for Sambhajinagar by charter plane.
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बुधवारी अमरावतीत जाहीर सत्कार सोहळा पार पडला. गुरुवारी ते संभाजीनगरकडे जाण्याच्या तयारीत असताना ढगाळ वातावरण, पाऊस आणि दृश्यमानता अयोग्य असल्यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाचे ‘टेक ऑफ’ करण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, हीच स्थिती कायम असल्यास चारचाकी वाहनाने संभाजीनगर गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुपारी १ ते ३ वाजताच्या सुमारास प्रशासनाची प्रचंड तारांबळ उडाली. सरन्यायाधीशांना संभाजीनगरकडे पाठविण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहने इंधनासह सुसज्ज़ केली होती. परंतु, तीन वाजता बेलोरा विमानतळ एटीसीकडून विमानाचे ‘टेक ऑफ’ करता येईल, असा निरोप आला अन् प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
दुपारी चार वाजताच्या सुमारास सरन्यायाधीश भूषण गवई हे पत्नी डॉ. तेजस्विनी, पुत्र जोतिरादित्य यांच्यासह ‘चार्टर प्लेन’ने संभाजीनगरकडे सत्कार सोहळ्यासाठी रवाना झाले. यावेळी खासदार बळवंत वानखडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद आदींनी त्यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या.
"ढगाळ वातावरण आणि पावसामुळे ‘एटीसी’ने विमानाच्या ‘टेक ऑफ’ला असमर्थता दर्शविली. मात्र, दुपारी तीन वाजताच्या सुमारास ‘एटीसी’ने परवानगी दिली. त्यानंतर सरन्यायाधीश दुपारी चार वाजता संभाजीनगरकडे रवाना झाले. थोडीफार धावपळ झाली, पण हे रूटीन काम आहे."
- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, अमरावती