विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात समस्यांचा ‘एरर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:01:22+5:30
नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू झाले. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागासह विविध शाळांनी स्थानिक पातळीवर तयारी केली आहे. झूम अॅपच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती/भातकुली : शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी ग्रामीण भागातील काही शाळांच्या शिक्षकांनी व्हॉट्सअॅप गु्रप तयार करून शिक्षण देणे सुरू केले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था अद्याप झालेली नाही. अनेक ठिकाणी मोबाईल रेंज, संगणकाचा अभाव, वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होणे अशा विविध अडचणींना समोरे जावे लागत आहे. याशिवाय ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांनाही आर्थिक भार सोसावा लागत आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू झाले. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागासह विविध शाळांनी स्थानिक पातळीवर तयारी केली आहे. झूम अॅपच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याविषयी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर काय खबरदारी घ्यावी, विद्यार्थ्यांची सुरक्षा कशी करायची, पालकांचे प्रबोधन कसे करायचे, असा विविधांगी विचार-विनिमय सध्या सुरू आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये विविध घटकांतील पाल्यांचा समावेश आहे. शालेय विद्यार्थ्यांची दहावी ते बारावी वर्गापासून भविष्याची वाटचाल सुरू होते. ग्रामीण भागात जास्तीत जास्त शेतमजूर, शेतकरी वर्गातील मुले, मुली आहेत. त्यांनीदेखील सावलीतील नोकरी करावी, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे ग्रामीण भागातही पालक आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे व तो एक चांगला शासकीय अधिकारी, कर्मचारी व्हावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकाला आहे. अशातच यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील तीन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. अशातच आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी अद्यापही शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळा विद्यार्थ्यांना व्हॉटसअॅप, झूमअॅपद्वारे मोबाइलवर शिक्षणाचे धडे देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या मोबाईलवर सुरू आहे. या शिक्षणासाठी शेतकरी, शेतमजूर व अन्य पालकांना मोबाईल रिचार्जच्या खर्चाचा भारही सोसावा लागत आहे. या खर्चानंतरही अनेक गावात मोबाईलची रेंज मिळत नाही. मोबाईल बॅटरी डिस्चार्ज झाली, तर चार्जिंगसाठी वीजपुरवठा नसतो. याचवेळी आॅनलाईन शिक्षणाचा वर्ग असतो. यासारख्या अडचणींमुळे पाल्य यात सहभागी होऊ शकत नाही.
अनेक अडचणी
अनेक शाळा व्हॉट्सअॅप, झूम अॅपवर विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. मात्र, ग्रामीण भागात फारच वेगळी परिस्थिती आहे. संगणक, इंटरनेट, मोबाईल उपलब्ध नसल्याने आॅनलाइन शिक्षण देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे यावर योग्य पर्याय शोधणे आवश्यक आहे. गरिबांवर खर्चाचाही भार पडत असल्याचे पालक जयकृष्ण सहारे यांनी सांगितले.