विजेच्या शॉकने आदिवासी विद्यार्थी दगावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारणी : नजीकच्या टिटंबा येथील शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. रविवारी ...

विजेच्या शॉकने आदिवासी विद्यार्थी दगावला
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : नजीकच्या टिटंबा येथील शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेला आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करून पालकांनी विद्यार्थ्याचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. राकेश रामकरण जावरकर (१३) असे मृताचे नाव आहे.
नागझिरा येथील आदिवासी विद्यार्थी राकेश जावरकर हा तीन वर्षांपासून शिक्षणाकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा टिटंबा येथे निवासी शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान शाळेतील त्याचे मित्र व तो शाळेच्या प्रांगणात विटीदांडू खेळत होते.
विटी मारण्यासाठीची काठी लहान असल्याने राकेश हा शाळेच्या आवारात असलेल्या बेहडा जातीच्या वृक्षावर चढला. त्याने झाडाची काठी तोडण्याचा प्रयत्न केला असता, त्या झाडावरून गेलेल्या जिवंत विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाला. विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा झाडावरच मृत्यू झाला. विद्यार्थ्यांनी शाळेतील अधीक्षक गणेश ठोंबे यांना राकेशच्या मृत्यूची माहिती दिली. त्याच्या लहान चुलत भावाने राकेशच्या वडिलांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. याप्रकरणी मुख्याध्यापक व आश्रम शाळेचे अधिक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती धारणीच्या एकात्मिक प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी दिली
मुख्याध्यापकाची फोनवर अरेरावी
राकेशचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या वडिलांना देणे गरजेचे असतानासुद्धा अधीक्षकांनी माहिती दिली नाही. नागझिºयाचे सरपंच रामकिसन धांडे व मृताचे वडिलांनी मुख्याध्यापक घनश्याम बोडके यांना फोनवर विचारणा केली. ‘तुम चुपचाप बैठो; मैने मरवाया क्या बच्चे को’ अशी अरेरावीची भाषा वापरून बोडके यांनी फोन कट केला. त्यामुळे त्यांनी लगेच नातेवाईकांना घेऊन टिटंबा आश्रमशाळा गाठले.
शवविच्छेदनाला पालकांचा नकार
आश्रमशाळेचे मुख्याध्यापक घनश्याम बोटके व अधीक्षक गणेश ठोंबे यांच्यावर निलंबनाची कारवाई होईस्तोवर मृताचे शवविच्छेदन करू नये, या मागणीसाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना साकडे घालण्यात आले. तोपर्यंत मृतदेह रुग्णवाहिकेतच ठेवण्यात आला. आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयातील उपायुक्त नितीन तायडे, आमदार राजकुमार पटेल, सहा. प्रकल्प अधिकारी किशोर पटेल यांनी पालकांशी संवाद साधून राकेशच्या मृत्यूला दोषी असलेल्या दोघांविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.