कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया होण्यापूर्वीच ग्रामीण भागात छुपा प्रचार सुरू झाला आहे. साधारणपणे लोकसभा-विधानसभा निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला ग्रामीण भागातील नागरिक अधिक पसंती देत असल्याचे सद्यस्थितीत दृष्टीस पडत आहे. इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून आपल्या परिसरातील मतदारांच्या भेटीगाठी प्रारंभ केल्या. याशिवाय पॅनेल इतरांपेक्षा कशी प्रभावशाली आहे, हे ठसवून सांगण्यासाठी गावपुढारी पुढे येत आहेत.
मार्च महिन्यामध्ये होणारी ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोना विषाणूच्या आगमनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. आता नव्याने होत असलेल्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण विकासाच्या मुद्द्यावर पुढे येत आहेत.
एकंदर गुलाबी थंडीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात तापत असल्याचे दिसत आहे.