सीईओ सायकलने पोहोचले जिल्हा परिषदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:01 IST2020-12-05T05:00:00+5:302020-12-05T05:01:00+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आग्रही आहेत. यामुळेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायकलचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे हे कांतानगर स्थित शासकीय बंगल्यापासून जिल्हा परिषदेत पोहोचले. त्यांचे पोलीस गार्डसुद्धा सायकलने आलेत.

सीईओ सायकलने पोहोचले जिल्हा परिषदेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वत:चे आरोग्य निरोगी ठेवण्यासोबतच पर्यावरणाचे संवर्धन आणि इंधन बचतीच्या उद्दिष्टासाठी महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालय सायकलने गाठले. इंधनचलित दुचाकी प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्या. अशा कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आग्रही आहेत. यामुळेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना सायकलचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे हे कांतानगर स्थित शासकीय बंगल्यापासून जिल्हा परिषदेत पोहोचले. त्यांचे पोलीस गार्डसुद्धा सायकलने आलेत. याशिवाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, प्रशांत थोरात, कॅफो चंद्रशेखर खंडारे, दत्तात्रय फिसके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे यांच्यासह अनेक कर्मचारी सायकलने कार्यालयात दाखल झाले. विशेष म्हणजे, काही महिला अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत्तीकडे झुकलेले कर्मचारी सायकलने आल्याचे दिसून आलेत. काही खातेप्रमुखांनी पायी येणे पसंत केले.
सायकलचा निर्णय ऐच्छिक
कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी सायकलसक्तीत सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सायकलने येणे ऐच्छिक केले, तर दिव्यांग, कर्मचारी, गंभीर आजारी, १० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे.
वेतनानंतर घेऊ सायकल
जिल्हा परिषदेत उपक्रमाच्या पहिल्या दिवशी काही कर्मचारी दुचाकी, ऑटोरिक्षाने आले. या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता, वेतन होताच सायकल खरेदी करू, असे त्त्यांनी सांगितले.
आरोग्य, पर्यावरण संवर्धनाचा संदेश या उपक्रमातून जात आहे. दोन दिवस सायलकने कार्यालयात येण्याबाबत सूचना दि्ल्या आहेत. त्याला ४० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. दिव्यांग कर्मचारीही सायकलने आले.
अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी