अमरावतीत कडक संचारबंदीपूर्वी बाजारात उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 16:24 IST2021-05-08T16:24:08+5:302021-05-08T16:24:31+5:30
Amravati news अमरावती जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ नंतर जिल्ह्यात कडक संचाबंदीचे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून इतवारा बाजारासह शहरातील किराणा दुकानांत एकच गर्दी उसळली.

अमरावतीत कडक संचारबंदीपूर्वी बाजारात उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात रविवारी दुपारी १२ नंतर जिल्ह्यात कडक संचाबंदीचे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून इतवारा बाजारासह शहरातील किराणा दुकानांत एकच गर्दी उसळली. एकाही ठिकाणी नियमांचे पालन झाल्याचे दिसून आलेले नाही. ११ वाजतानंतरच्या संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार दिसून आला.
महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने जिल्ह्यात १५ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कित्येक पटीने वाढल्याने आता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी १२ वाजतापासून १५ मेच्या रात्री १२ पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याकालावधीत कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी आहे व या आदेशाची कठोर अंंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी बाजारात मोठी गर्दी उसळल्याचे दिसून आले.
शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक किराणा दुकानात सकाळपासून मोठी गर्दी दिसून आली. याशिवाय फळांची दुकाने हातगाड्या, भाजीपाल्याच्या दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मोठी दुकाने काही मॉल्समध्ये पहाटेपासून रांगा दिसून आल्या. या सर्व ठिकाणी लाॅकडाऊनपूर्वी कोरोना प्रतिबंधक नियमाला हरताळ फासल्या गेल्याचे दिसून आल्याने कुठे आहे कोरोना, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा
महापालिका क्षेत्रासह तालुक्यांच्या मुख्यालयी असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांमध्ये फिजिकल डिस्टन्सचा बोजवारा उडाला असल्याचे दिसून आले. मोठी गर्दी असल्याने दुकानदारांनीही याकडे दुर्लक्ष केले. काही दुकाने दुपारी १२ पर्यंत सुरू असल्याचेही दिसून आले. नागरिकांनी एकच गर्दी केल्याने जयस्तंभ व राजकमल चौकात याशिवाय इतवारा बाजारात वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले.
पेट्रोल पंपावरही मोठ्या रांगा
शहरातल्या पेट्रोलपंपावर सकाळपासून नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. संचारबंदीत सर्व काही बंद असताना व नागरिकांच्या फिरण्यावर निर्बंधातही पेट्रोलपंपावर एवढी गर्दी का, हा प्रश्न पडला आहे. रविवारी दुपारी बारापर्यंत जीवनावश्यक वस्तूसह पेट्रोलपंप सुरू राहणार असताना नागरिकांनी शनिवारी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसून आले. ‘नो मास्क, नो पेट्रोल’याचाही विसर पडल्याचे दिसून आले.
एटीएमवरही रांगा
बँका, पतसंस्था व पोस्ट ऑफिस दुपारी २ पर्यंतच आठ दिवस सुरू राहणार असल्याने नागरिकांनी शनिवारी एटीएमवर गर्दी केल्याचे दिसून आले.
रविवारी देखील हीच स्थिती राहणार असल्यामुळे एटीएममध्ये ठणठणात राहणार आहे. त्यामुळे बँकांनी एटीएममध्ये पुरेशी रोकड भरणे महत्त्वाचे आहे. अन्यथा ग्राहकांची गौरसोय होणार आहे.